पेणच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांचा गलथान कारभार
। पेण । संतोष पाटील ।
जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार रामभरोसे सुरु आहे. अनेकदा तक्रारी आल्यानंतर याबाबतची सत्यता पडताळण्याचे काम गुरुवारी कृषीवलच्या प्रतिनिधीने केले. यावेळी कामाच्या वेळेत पेण कार्यालयातील अधिकारीच जागेवर नसल्याचे समोर आले. परिणामी, आरोग्यच्यादृष्टिने महत्वाच्या असणार्या या विभागातील अधिकार्यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शासन नियमानुसार पाच दिवसाचा आठवडा झाल्याने कार्यालयीन कामाच्या वेळा वाढल्या आहेत. परंतु, याचे भान सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील कर्मचार्यांना नसल्याचे दिसून आले. या कार्यालयात सकाळी 9.30 वाजता चतुर्थ श्रेणीतील कामगारांचे काम सुरु होते; तर वरिष्ठ अधिकारी सव्वादहा वाजल्यानंतर कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अनेकदा तक्रारी आल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे पितळ उघडे पाडण्यासाठी कृषीवलच्या प्रतिनिधीने गुरुवारी (दि.4) सकाळी 10 वाजता सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयास भेट दिली. त्यावेळी शिपाई लक्ष्मण वामन साळवे हजर होते. तर या कार्यालयात वरिष्ठ पदावर असलेले सहाय्यक आयुक्त द.च.शेख, औषध निरीक्षक बी.ए.यादव, औषध निरीक्षक हेमंत आडे, सहाय्यक आयुक्त ल.दं.दराडे, अन्नसुरक्षा अधिकारी दे.गो.वीर, वि.वि.शिंदे, वि.श्री.निकम, स.रा.आढाव यांच्यासह दोन शिपाई, तीन लिपीक हे कर्मचारी सव्वादहाची वेळ झाली तरी हजर नव्हते.
सकाळी 10 वाजून 7 मिनिटांनी सहाय्यक आयुक्त द.च.शेख यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला. परंतु, त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर सहाय्यक आयुक्त ल.दं.दराडे यांना 10 वाजून 8 मिनिटांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही फोन उचलण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यानंतर जवळपास 10.30 वाजता ल.दं.दराडे यांचा समोरून फोन आला. त्यावेळी त्यांना कार्यालयाच्या कामकाजाविषयी विचारणा केली असता ते निरुत्तर झाले. ‘म्ही रोज वेळेवर येतो. आज उशीर झाला,’ असे सांगून त्यांनी फोन बंद केला. यावरुन ज्या कार्यालयावर रायगड जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे, ते कार्यालच वार्यावर सोडले असल्याचे दिसून आले.
सरकारने कर्मचार्यांना शिस्त लागावी. अधिकार्यांनी वेळेत हजर रहावे, याकरीता बायोमेट्रिक मशिन लावले. असे असतानाही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हे अधिकारी वेळेचे बंधन पाळत नाहीत. त्यामुळे अशा अधिकार्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
असे चालते या विभागाचे कामकाज
प्रत्येक हॉटेल, खानावळीपासून तर रस्त्यावरील टपरी आणि पानठेल्यापर्यंतच्या प्रत्येक खाद्य पदार्थांच्या विक्रीवर अन्न प्रशासन विभागाचे नियंत्रण असते. खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता, वापरल्या जाणार्या साहित्याची शुद्धता याची वेळोवेळी तपासणी आणि परवान्यांचे नुतनीकरण करणे गरजेचे असते. पानठेल्यांमधून विक्री होणार्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची तपासणीही हाच विभाग करतो. याच पद्धतीने औषधी विक्री करणार्या मेडिकल स्टोअर्सला नियमित भेटी देऊन तपासणी करण्याचे काम औषधी निरीक्षकांना करावे लागते.