कार्यक्रम दिमाखदार करण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या सूचना
| रायगड | खास प्रतिनिधी |
ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा 98 वा वर्धापन 20 मार्चला महाड येथे साजरा होत आहे. तसेच मोठ्या संख्येने अनुयायी येतात. हे लक्षात घेता एसटी महामंडळाच्यावतीने 19 ते 21 मार्च या कालावधीत माणगाव, वीर, वामने व करंजाडी रेल्वे स्थानक ते महाड शहर अशी जादा बस व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केल्या आहेत.
आरोग्य, पाणी, स्वच्छतागृह यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करावे. या सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. महाड चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला. चवदार तळ्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता कार्यक्रमाचे नियोजन दर्जेदार व उत्कृष्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रवींद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी नगरपरिषदेमार्फत चवदार तळे, भीमनगर, क्रांती स्तंभ, स्मारक परिसराची साफसफाई करण्यात यावी तसेच शहरातील विविध ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करावे. तसेच क्रांती स्तंभ परिसरात 100 मोबाईल शौचालये, स्नानगृहे उभारण्यात यावेत, अशा सूचना दिल्या. तसेच महाड ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णवाहिका तसेच पुरेसा औषधसाठा व आरोग्य पथक तैनात राहील याची दक्षता घ्यावी. याबरोबरच अखंडित वीजपुरवठा तर अनुयायींची वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी दिल्या.
या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी पोलीस यंत्रणेने घ्यावी, वाहतुकीचे नियोजन करावे, तसेच शासकीय मानवंदना देण्यात यावी, अशा सूचना दिल्या. एसटी महामंडळाच्यावतीने 19 ते 21 मार्च या कालावधीत माणगाव, वीर, वामने व करंजाडी रेल्वे स्थानक ते महाड शहर अशी जादा बस व्यवस्था केली जाणार आहे. या नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली. या ठिकाणी येणार्या अनुयायी यांना पिण्याचे पाणी, सावलीसाठी मंडप तसेच संपूर्ण परिसरात दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. अनुयायी यांना देण्यात येणार्या अल्पोपाहाराचा दर्जा राखावा तसेच देण्यात येणार्या फूड पॅकेटची तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अनुयायांची संख्या लक्षात घेता कुठलीही गैरसोय होणार नाही याची सर्व शासकीय विभागांनी दक्षता घेऊन नियोजन करावे, असेही जावळे यांनी सांगितले.