वेंकटेश प्रसादचे ट्वीट चर्चेत
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था |
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आणखी एका आयसीसी चषकात खेळणार आहे. गेल्या 11 वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची आणखी एक संधी आहे.
विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणार असून यासाठी खेळाडूंची पारख केली जात आहे. रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. तर विराट कोहलीची सध्याचा फॉर्म पाहता संघात निवड होणार यात शंका नाही. असे असताना माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद याच्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. वेंकटेश प्रसादने तीन नावांची शिफारस निवड समितीकडे केली आहे. प्रसादने एक्सवर लिहिलं आहे की, ”शिवम दुबे स्पिनर्सविरुद्ध मोठे शॉट्स खेळण्यासाठी, सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि रिंकू सिंह फिनिशिंगसाठी संघात असायला हवा. टी-20 विश्वचषकात प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले तर एकदम मस्त होईल.”
वेंकटेश प्रसादचं ट्वीट इथपर्यंत ठीक होतं. पण त्यानंतर लिहिलेल्यचा वाक्यांचा अर्थ वेगळाच निघत आहे. सोशल मीडियावर जो तो आपल्या पद्धतीने अंदाज बांधत आहे. ”संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीमुळे पाच जागा होतील. त्यानंतर फक्त यष्टीरक्षक फलंदाजासाठी जागा उरणार आहे. आता यातून काय बाहेर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.” वेंकटेश प्रसादच्या या ट्वीटचा अर्थ अष्टपैलू हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळणं कठीण आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर गेला होता. त्यानंतर ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्समध्ये आला आणि त्याला कर्णधारपद सोपवलं गेलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर हार्दिक पांड्या थेट आयपीएल स्पर्धेत उतरला. पण त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यापैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यात त्याची कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याची निवड होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे, शिवम दुबेने चेन्नई सुपर किंग्ससाठी 160 च्या स्ट्राईक रेटने 176 धावा केल्या आहेत. एक दमदार अर्धशतक झळकावलं आहे. तर फिरकीपटूंना झोपटण्याचा त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे वेंकटेश प्रसादने दिलेले पर्याय निवड समिती कशी हाताळते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. विश्वचषकासाठी संघ निवडीची अंतिम तारीख 1 मे आहे. तर संघामध्ये फक्त एकच बदल करण्याची संधी 25 मे पर्यंत असेल.