। कर्जत । वार्ताहर ।
जून महिन्याची 18 तारीख उलटून गेली अजून पावसाची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी वाड्यावर पाणी टंचाई जाणवू लागल्यामुळे त्यांच्या मदतीला सद्भभाव फाउंडेशन मुंबई धावली आहे. त्यांनी कर्जत तालुक्यातील टंचाईग्रस्त वाड्यांना मोफत पाणी पुरवठा केला आहे. ही अशासकीय सामाजिक संस्था असून कर्जत व खालापूर तालुक्याचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग आदिवासी व डोंगराळ भागात राहणारी गरीब व गरजू लोकांसाठी गेली आठ वर्ष संस्था टँकरमार्फत पिण्याचे पाणी पुरवत आहे. तालुक्यातील जांभूळवाडी, कोठिंबे, पिंपळपाडा, मेचकरवाडी, पिंगळसवाडी,भल्याची वाडी अशा अनेक ठिकाणी संस्था पिण्याचे पाणी पुरवत आहे.
संस्थेचे 900 बचत गट आहेत. 600 वैयक्तिक शौचालय बांधकाम केले आहे. तसेच संस्थेच्या मार्गदर्शनाखाली किशोर वयातील मुलींना मार्गदर्शन शिबिरे, शालेय वस्तूंचे वाटप, आयुर्वेदिक शिबीरे, नेत्र तपासणी शिबीरे, गावोगावी मोफत शिवणवर्ग असे विविध उपक्रम संस्थेमार्फत चालवले जातात. यासाठी संस्थेचे ट्रस्टी मधुकर सेठ, नीता दोषी यांचे सहकार्य लाभत आहे.