| रायगड | खास प्रतिनिधी |
अवघा देश राममय झालेला असताना, अलिबाग विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या वाल्मिकी रामायण कथेला उदंड प्रतिसाद मिळाला. अलिबाग नगरीतील व्याख्याते आणि वाल्मिकी रामायणाचे गाढे अभ्यासक अॅड. श्रीराम ठोसर यांनी 24 ते 28 जानेवारी या कालावधीत ब्राह्मणआळी अलिबाग येथील राम मंदिरात वाल्मिकी रामायण कथा सादर केली.
पाच दिवस रोज सायंकाळी मंदिरात राम भक्तांनी राम कथा ऐकायला गर्दी केली होती. इतकेच नाही, तर अक्षय केबल आणि जेएसव्हिजन अलिबाग या युट्यूब चॅनलवर याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामाध्यमातून हजारोंच्या संख्येने श्रोते जोडले गेले होते. रोजच्या कार्यक्रमात राम जन्म, विवाह, तसेच राज्याभिषेक सोहळा असे रामजीवनातील काही क्षण प्रसंगानुसार, प्रेक्षक सहभागातून साजरे करण्यात आले. जन्माच्या दिवशी पायस, रामाच्या लग्नाचे लाडू, शबरीने दिलेला रानमेवा अशा रोजच्या प्रसंगानुसार दिला गेलेल्या प्रसादाने श्रोते कमालीचे भारावून गेले होते.
पाचशे वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अयोध्या नगरीत रामलल्ला विराजमान झाल्याने राम कथेचे मूळ असलेले वाल्मिकी रामायण ऐकायची पर्वणी लोकांना मिळाली. ‘रावणा’ बाबत तसेच ‘लक्ष्मण रेषा’ आणि काळाच्या ओघात निर्माण झालेले अनेक गैरसमज तर दूर होण्यास मदत झाली. त्याचबरोबर सुसंस्कृत मानवी जगण्याशी असलेला रामकथेचे आदर्श हे जीवनमूल्य समृध्द करणारे आहे. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया श्रोत्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या. रामजीवन सर्वदूर पोहोचवता आले. या बाबतचे समाधान आयोजकांच्यावतीने समीर दिघे यांनी व्यक्त केले. तसेच, प्रसिध्दी सहकार्याबाबत आभार मानले. सदरचा कार्यक्रम जेएस व्हिजनवर पाहता येणार आहे.