चिरनेर | वार्ताहर |
चिरनेर गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, स्वातंत्र्य संग्रामाच्या अग्निकुंडात परिसरातील आठ शेतकरी शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या हुतात्म्यांना 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
शूरवीरांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या उद्देशाने चिरनेर येथे हुतात्मा स्मृतीस्तंभ उभारण्यात आला असून, चिरनेर जंगल सत्याग्रहात आपल्या प्राणाची बाजी लावणार्या आठ हुतात्म्यांची पूर्णाकृती शिल्प चित्रही उभारण्यात आली आहेत. या स्मृतिस्तंभासमोर दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी शासकीय मानवंदना देऊन अभिवादन करण्यात येते, त्याचप्रमाणे नऊ ऑगस्ट रोजीच्या क्रांतिदिनी चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन व चिरनेर ग्रामस्थानतर्फे हुतात्म्यांना पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात येते.
यावर्षीही क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य बाजीराव परदेशी, उरण पं.स. सभापती शुभांगी पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, पोलीस पाटील संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, ग्रामविकास अधिकारी महेश पवार तसेच चिरनेर ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.