थंड पेय, फळांना वाढती मागणी

| पनवेल । वार्ताहर ।

गेल्या आठवडाभरापासून पनवेल शहर आणि परिसरातील तापमान कमालीचे वाढल्याने सारेच हैराण झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून आता थंड पेयांना मागणी वाढली आहे. तर, आरोग्यपूरक फळांनाही आता चांगला भाव आलेला आहे. मार्च  संपत असतानाच आलेल्या उष्माच्या लाटेचा परिणाम चांगलाच झाला आहे. पहाटेच्यावेळी हवेत गारवा आणि भरदुपारी लाहीलाही करणारे उन असे विचित्र हवामान सध्या शहरवासीय अनुभवत आहेत. त्यामुळे दुपारच्यावेळी शहर आणि परिसरात कमालीचा शुकशुकाट जाणवत असतो.

कोकणात यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तीव्र जाणवू लागला आहे. तसा अंदाजही हवामान खात्याने वर्तविलेला आहे. यामुळे ऐन उन्हात कोरड पडलेल्या घशाला ओलावा मिळावा म्हणून थंड पेयांना मागणी वाढली आहे. ठिकठिकाणी गल्लोगल्लीत बर्फाचे गोळे विक्रेते फिरताना दिसत आहेत. पंधरा ते वीस रुपयांपर्यंत हे रंगीबेरंगी बर्फ गोळे विकले जात आहेत. याशिवाय आईस्क्रिम, कुल्फी, थंड पेये यानाही मागणी वाढली आहे. बाजारात लिंबांनाही चांगला भाव आलेला आहे. याशिवाय थंडगार सब्जाही विकला जात आहे.

फळांना मागणी वाढली
बाजारात द्राक्षे, कलिंगडे यांनाही ग्राहकांची पसंती मिळत असून, द्राक्षे 70 ते 80 रुपये किलोने विकली जात आहेत. तर, कलिंगडेही किमान 50 रुपयांपासून विकली जात आहेत. रसवंतीगृहातही गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजारात सफरचंद, पेरु, डाळिंब या फळांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. तर, टरबूजाची आवक सुरू झाली असून, त्यांच्या किमती आवाक्यात असल्याने ग्राहकांची या फळांना मागणीदेखील वाढली आहे. सध्या सफरचंदाचे सर्वांत जास्त प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये काश्मिरी, इराण या प्रकारातील सफरचंदाच्या किमती वाढल्या. एक किलो सफरचंदासाठी 100 ते 280 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. याशिवाय लाल पेरु 260 रुपये किलो, साधे पेरु 160 रुपये किलो, तर साऊथ आफ्रिकन पेरुची किंमत 240 रुपये किलो आहे.

Exit mobile version