| खोपोली | प्रतिनिधी |
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या मुंबई लेनवरील आयओडीशी बोगद्याजवळ सुमारे 50 फुट उंचीवर सुमारे 5 टन वजनाचा मोठा दगड संरक्षण जाळीत अडकून राहिल्याचे निदर्शनास आले होते. पावसाळ्याच्या तोंडावर हा दगड खाली कोसळल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांनी तातडीने परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी, वाहतूक विभाग आणि संबंधित तांत्रिक यंत्रणांशी समन्वय साधून तातडीची कारवाई हाती घेण्यात आली.
या संदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण सांखळे यांनी विशेष आदेश जारी करून, गुरूवारी (दि.18) दुपारी 12 ते 2 या वेळेत संबंधित भागातील वाहतूक नियंत्रित करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे दगड हटवण्याचे काम अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे शक्य झाले. या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे-मंडव, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे, प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, खंडाळा आणि वडगाव येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंते, आयआरबी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि संरक्षक जाळी उभारणाऱ्या मेकाफेरी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे साईट इंजिनिअर अक्षय परशिया व अभिजीत सावंत यांनी त्यांच्या तांत्रिक पथकासह ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.
संपूर्ण कारवाईदरम्यान पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी आणि तांत्रिक पथक यांच्या अचूक समन्वयामुळे कोणतीही जीवितहानी अथवा अपघात घडला नाही. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत दगड सुरक्षितरीत्या खाली उतरवून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या संयुक्त आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे एक मोठा संभाव्य अनर्थ टळला असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व यंत्रणांच्या सतर्कतेचे, कार्यतत्परतेचे आणि समन्वयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.







