रेवदंड्यासह मुरूड चौपाटी हाऊसफुल्ल
। रेवदंडा । विषेश प्रतिनिधी ।
शाळेला व महाविद्यालयांना सुट्टी पडल्याने आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटकांची पावले कोकणासह रायगड जिल्ह्याकडे वळली आहेत. त्यामुळे रायगडातील रस्ते व पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातच कोकणातील निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले रेवदंडा सध्या पर्यटकांचे ‘ड्रीम डेस्टिनेशन’ बनले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे येथील समुद्रकिनार्यावर पर्यटकांची जबरदस्त गर्दी उसळली आहे. दरम्यान, मुरूड तालुक्यातील ऐतिहासीक जंजीरा किल्ला पाहण्यासाठी देखील राजापुरी जेट्टीवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह राज्यभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर रेवदंडा आणि चौल परिसरात दाखल झाले आहेत. येथील शांत, स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा, नारळी-पोफळींच्या बागा, तसेच ऐतिहासिक आगरकोट किल्ला ही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. विशेष म्हणजे, आजपर्यंत या समुद्रकिनारी कोणतीही दुर्घटना न झाल्यामुळे रेवदंडा चौपाटीची सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून खास ओळख तयार झाली आहे. तसेच, रेवदंड्यासह मुरूड समुद्रकिनारी सायंकाळच्या वेळेत रुपेरी वाळूवर चालताना, फेसाळणार्या लाटांमध्ये खेळताना आणि झुळझुळणार्या वार्याचा आनंद घेताना पर्यटक एक वेगळीच दुनिया अनुभवत आहेत. चौपाटीवर छोटे-मोठे गट क्रिकेट खेळताना, लाटा अंगावर झेलत जल्लोष करताना, वाळूत बसून नारळपाणी, सरबत आणि खाद्यपदार्थांचा अस्वाद घेताना दिसून येत आहेत.
तसेच, पापलेट, सुरमई, कोळंबी, कालवं, चिंबोरी (खेकडे) हे मासे थेट समुद्रातून ताजेतवाने मिळत असल्याने रेवदंड्यासह मुरूड हे ठिकाण मासेप्रेमींसाठी कोकणातील पारंपरिक चव अनुभवण्याची ही खास संधी ठरत आहे. एकंदरितच, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये निसर्ग, समुद्र, इतिहास आणि चविष्ट रानमेवाचा संगम अनुभवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे.
पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन
सुट्ट्यांमध्ये बच्चे कंपनीची रेलचेल तर अधिकच वाढलेली आहे. रेवदंड्याची अजून एक विशेषता म्हणजे रेवदंडा चौल परिसरातील विशिष्ठ भागांना प्री वेडिंग शूटसाठी अधिक पसंती मिळत आहे. तरुण मंडळी समुद्राच्या पार्श्वभूमीवर, ऐतिहासिक आगरकोट किल्ल्याच्या साक्षीने आपले क्षण कॅमेर्यात टिपून घेत असतात. निसर्ग, इतिहास आणि प्रेमाचा त्रिवेणी संगम असलेले हे ठिकाण नवदाम्पत्यांसाठी ‘ड्रीम डेस्टिनेशन’ ठरत आहे. याशिवाय, स्थानिकांनीही कॅम्पिंग व्यवसायात झेप घेतल्याने पर्यटकांना मुक्कामासाठी सुंदर पर्याय उपलब्ध झाले आहेत.
खवय्यांना रानमेव्याची मेजवानी
शनिवार-रविवारी पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. सकाळी आगरकोट किल्ल्याला भेट, दुपारी समुद्रस्नान आणि सायंकाळी सूर्यास्ताचा नजारा, असा एक परिपूर्ण पर्यटन दिनक्रम येथे अनुभवता येतो. त्याचबरोबर रेवदंडा परिसरातील उन्हाळी रानमेवा म्हणजेच ओले काजू, जांभळं, करवंद, रांजण, ताडगोळे यांची चव चाखण्यासाठीही अनेक खवय्ये येथे गर्दी करत असतात. स्थानिक विक्रेत्यांकडून मिळणारा हा ताजातवाना रानमेवा पर्यटकांच्या जिभेवर रूचत आहे. तसेच, ताज्या समुद्री मासळीच्या चवीने देखील खवय्ये मंत्रमुग्ध होत आहेत.