| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील मिनी माथेरान म्हणून प्रसिद्ध असेलेले पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणून पनवेल हाकेच्या अंतरावर असलेले घनदाट अरण्याने घेरलेले आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणून पाहिले जात असलेले कर्नाळा अभयारण्य सुट्टीच्या दिवसात पर्यटकांचे आवडीचे ठिकाण ठरत आहे. मुंबई ते पुण्यापासून उन्हाळी सुट्टीत पाच हजारांच्यावर पर्यटकांनी अभ्यारण्यात हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. हे ठिकाण निसर्गप्रेमींचे आवडीचे ठिकाण ठरत असून, पर्यटकांकडून आकारण्यात येणार्या शुल्कातून वनविभागाच्या महसुलातसुद्धा भर पडत आहे.
पनवेल शहरापासून 12 किमी अंतरावर अतिशय सुंदर रमणीय व विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी व पक्ष्यांनी समृध्द असे कर्नाळा अभयारण्य आहे. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ, पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे 134 प्रजातींचे स्थानिक, तर 38 प्रजातींचे स्थलांतरीय पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात.
पाण्यासाठी केवळ एकच बोअरवेल
दरम्यान, कडक उन्हामुळे हे पक्षी उन्हाळ्यात अडचणीत सापडतात. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अभयारण्य परिसरात पक्ष्यांसाठी तीन तलाव खोदण्यात आले असले तरी ते दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या आले असले तरी ते दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या गेल्यावर्षी लवकरच तलावातील पाणी बदलत्या हवामानामुळे आटले. त्यामुळे अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. वास्तविक पाहता तलावात गाळ साठल्याने जलाशय उथळ झाले होते. दरम्यान, संपूर्ण अभयारण्यात पाण्यासाठी एकच बोअरवेल असून पाईपलाईनच्या माध्यमातून विश्रामगृहापर्यंत पाणी नेले जात होते, परंतु कडक उन्हाळ्यात हे पाणी पुरेसे पडत नव्हते.
उन्हाळ्यातसुद्धा जाणवतोय गारवा
विशेष म्हणजे 12 किमी क्षेत्र असलेल्या या अभयारण्यात कुंडया ठेवाव्या लागत होत्या, मात्र गेल्या वर्षी पाणीटंचाई निवारण्याकरिता अभयारण्य प्रशासनाने विश्रामगृहालगत असलेल्या सिमेंटच्या बंधार्यातील माती आणि गाळ उपसला असल्याने उन्हाळ्यातसुद्धा गारवा जाणवत आहे.