बहिरम कोटकमधील खांडींचे काम युद्धपातळीवर
। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील बहिरम कोटक गावाच्या हद्दीत भर पावसात नारवेल बेनवले या खारबंदिस्तीला गेलेल्या खांडीचा मुद्दा कृषीवलमधून प्रसिद्ध होताच खारभूमी तसेच संबंधित ठेकेदार ताळ्यावर आले असून. ज्या ठिकाणी खांड गेली होती तिथे सामानासह पोहोचले. व युध्द पातळीवर खांडीचे काम पूर्ण केले. त्या बद्दल बहिरम कोटक येथील शेतकर्यांनी कृषीवलचे विशेष आभार मानले.
पेण शहरापासून 15 ते 20 किलोमीटर खारेपाटात असणार्या बहिरम कोटक येथे जाण्यासाठी आता कोणत्याही वाहनांची सुविधा नसताना देखील दै.कृषीवलने शेतकर्यांची व्यथा जाणून घेतली व खारबंदिस्तीला गेलेल्या खांडी विषय संबंधित अधिकार्यांना विचारणा करून खांड तातडीने बांधून देण्यासाठी प्रयत्न केले. कृषीवलच्या पेण प्रतिनिधीच्या सांगण्यावरून खारभूमी विभागाचे अभियंता दादासाहेब सोनटक्के यांनी तातडीने घटनास्थळी लाकडी खांबे, लोखंडाच्या सलया, यासंह तेथे लागणार्या सामानांची वाहतूक होडी द्वारे करून कामाला सुरूवात करीत पूर्णही केले.
मी वारंवार ठेकेदाराला व ठेकेदाराच्या माणसांना कामाच्या दर्जाविषयी बोलत असतो. तसेच ज्या ठिकाणी जास्त खोल आहे त्या ठिकाणी स्टीलचा वापर देखील करायला सांगतो. परंतु ठेकेदाराची माणस माझे काही न ऐकता मनमानेल तसे करत असतात. आणि बोलायला गेल्या नंतर राजकीय नेत्यांची धमकी देतात. अशा प्रकारचा रिपोर्ट देखील मी वरिष्ठांना कळविला आहे. दयानंद पाटील यांच्या घराजवळची खांड योग्यप्रकारे बांधण्याचा पुरेपुर प्रयत्न मी केला आहे. जेणे करून भरतीचे पाणी शेतीमध्ये घुसणार नाही.
दादासाहेब सोनटक्के, अभियंता
पुर्ण खारबंदिस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे झालेले असून माझ्या तळयाच्या बाजूला वारंवार खांडी जात आहेत. या बाबत अधिकारी वर्गाला सांगितले तरी अधिकारी वर्ग हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. मात्र ज्या वेळेला माझ्या येथील खांडीचे वृत्त कृषीवलमध्ये प्रसिध्द झाले त्यावेळी खारभूमीच्या अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट देउन तात्काळ खांडीचे काम सुरू केले आहे.
दयानंद पाटील, शेतकरी