सरकारने कोट्यवधींची बिले थकवल्याचा ठेकेदार संघटनेचा आरोप
| रायगड | खास प्रतिनिधी |
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने राज्यभरातील ठेकेदारांची कोट्यवधींची बिले अडकली आहेत. ठेकेदारांच्या संघटनेने राज्यातील सर्व विकासाची कामे 5 फेब्रुवारी 2025 रोजी बंद केली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिली. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कायार्लयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले.
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी दर महिना 30 ते 35 हजार कोटी खर्च करावे लागतात. ठेकेदारांचे 45 हजार कोटी देणे बाकी असताना सरकार फसव्या घोषणा देत आहेत, अशी टीका संघटनेने केली. ठेकेदारांवर उपाशी मरायची वेळ आली आहे. जसे शेतकरी आत्महत्या करतात, तशी वेळ ठेकेदारांवर सरकारने आणली आहे. स्थानिक आमदारांनी अव्वाच्या सव्वा कामे राज्याचे आर्थिक बजेट काय याचा विचार न करता मंजूर करून आणली. आता केलेल्या कामांचे पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे. आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असा सूर उपस्थित ठेकेदारांनी लावला होता. मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्याने आज मोर्चा काढल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पालरेचा, रायगड विभागीय अध्यक्ष राजू पिचीका, अमीर उर्फ पिंट्या ठाकूर, सचिन मोरे, अनिरूद्ध पाटील इ. उपस्थित होते. ठेकेदारांपैकी बहुतेक सर्व जण कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या ठेकेदारांच्या उपस्थितीत सरकारवर टीकेची झोड उठवली जात असल्याने जनतेमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते.