कुंटेबाग व वरसोली समुद्रकिनारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
जिल्हाभरात लावण्यात येणार 6 लाख 41 हजार 600 झाडे
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.1) अलिबागमधील कुंटे बाग व वरसोली समुद्रकिनारी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा वृक्षलागवड कार्यक्रम संपूर्ण महिनाभर राबविण्यात येणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीत 800 झाडे असे एकूण 6 लाख 41 हजार 600 झाडे जिल्ह्यात लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वृक्षलागवड मोहीम ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे, समुद्र किनार्यावर खुल्या जागेत, दरड प्रवण क्षेत्रातील डोंगर पायथ्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी, पूरक्षेत्रातील गावामधील नदी किनार्यालगतच्या ठिकाणी प्रामुख्याने राबविण्यात येणार असून, या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. या मोहिमेंतर्गत भारतीय प्रजातींची विविध झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच बांबूची बेटे निर्माण करण्याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, कृषी विस्तार अधिकारी राजेश घरत, अलिबाग पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळावकर, तालुका कृषी विस्तार अधिकारी प्रार्थना भोईर, वरसोली ग्रामपंचायत सरपंच प्रमिला भाटकर, विजय सावळे उपस्थित होते.
महिला बचत गटांना बियाणे वाटप
जिल्हा परिषद कृषी विभाग शेष निधीमधून परसबागेत भाजीपाला लागवड करण्यासाठी बियानांचे मिनी किट तयार करण्यात आले आहेत. हे मिनी किट जिल्ह्यातील अंगणवाड्या, महिला बचतगट यांना वाटप करण्यात येणार आहेत. सुमारे 19 हजार किटचे वाटप करण्यात येणार असून, 10 हजार किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित 9 हजार किट वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
लावलेल्या रोपांचे होणार संगोपन
जिल्ह्यातील विशेषत: जिल्हा परिषदेच्या अखात्यारीतील सर्व इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक रोप व प्रत्येक शिक्षकाने किमान 2 रोपे आणि सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांना किमान 2 रोपे दत्तक घेऊन वृक्षारोपण करण्याचे आहे. त्याचप्रमाणे लावलेली रोपे कायमस्वरुपी जगविण्यासाठी त्यांच्याभोवती संरक्षक जाळी, बांबू किंवा लाकडाचे कुंपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभाग घेण्यात यावा व वृक्षलागवड व संवर्धनासाठी शपथ देण्यात यावी.
– डॉ. किरण पाटील