। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला असला तरी अद्याप ते वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. या बंगल्यात काळी जादू करण्यात आली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला फटकारले आहे. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ हा वेड्यांचा, अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे, अशी टीका त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री कुणीही झाला तरी ते वर्षा बंगल्यावर धाव घेतात. परंतु, आपले मुख्यमंत्री जात नाहीत. कारण सध्या ते ताक फुंकून पित आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा आहे त्यामुळे सध्या ते वर्षावर जात नाहीत. मी त्यांच्या मुलीला शुभेच्छा देतो की ती बोर्डात पहिली येऊन दे. पण सागर रामटेकला आहे आणि वर्षा लखनौला आहे असं नाही ना. सागर बंगल्यात आणि वर्षामध्ये पाच पाऊलांचे अंतर आहे. तरीही मुख्यमंत्री वर्षावर जात नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, जादूटोण्याची कारावाई करायची असेल तर एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस आमदारांवर करा. जे कामाख्या देवीला गेले आणि रेडे कापून येऊन सत्तेवर बसले. त्यांच्यावर कारवाया करा. कारावाया केल्या तर प्रधानमंत्र्यांपासून सर्वांवर कारवाया कराव्या लागतील. काही विषय श्रद्धेचे असतात तर काही विषय अंधश्रद्धेचे असतात. मूळात एकनाथ शिंदेचे सरकार अंधश्रद्धेतून तर फडणवीसांचे सरकार ईव्हीएम घोटाळ्यातून निर्माण झाले होते हे त्यांनी मान्य केले पाहिजे. त्यामुळे मी काय सांगतोय ते समजून घ्यायला शहाणा माणूस पाहिजे, आम्ही शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची माणसं काय सांगतात ते त्यांना कधीच समजणार नाही. कारण यांच्या डोक्यात गुंगी भरली आहे. हे सर्व गुंगीत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.