मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन
। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशात आणि राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आघाड्यांनी एकमेकांवर जाहीर सभांमधून टीका-टिप्पणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय पक्ष जागावाट, टीका-टिप्पणीत व्यग्र असताना दुसरीकडे मराठा आरक्षण व आंदोलनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे.
चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.यावेळी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला. देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे. माता-माऊलींवर गोळ्या घालणार्या अधिकार्यांना त्यांनी बढती दिली आहे. पोलिसांच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वीचे गुन्हे अगदी कालपर्यंत दाखल करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे ते गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखे आहेत, असं ते म्हणाले.
मराठा समाजानं एक लक्षात घ्यावं, पाडण्यातही मोठा विजय आहे. मराठ्यांनी 100 टक्के मतदान करावं. यांना इतक्या ताकदीनं पाडा की इथून पुढे यांना मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे. मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. आता मराठा समाज यांचा राईट कार्यक्रम करेल. पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. महायुतीनं आम्हाला फसवलं आहे. सरकारला आमच्या छातीत लागलेल्या गोळ्या दिसत नाहीयेत. समाजाला बरोबर कळलंय कुणाच्या विरोधात मतदान करायचंय. मराठे कुणाच्याही सभांना जात नाहीत. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अजूनही गृहमंत्र्यांना सांगतो. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. मी निष्ठावान आहे. मी माझी जात विकू शकत नाही. तुम्ही माझ्या नादी लागू नका. मला तुम्ही आंदोलनात हलक्यात घेतलं होतं. मला राजकारणात हलक्यात घेऊ नका. मला तिकडे जायचं नाहीये. पण मला राजकारणात ओढायचा प्रयत्न केला, तर तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल. दलित, मराठा, मुस्लिम, लिंगायत, बारा बलुतेदार असे सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. यांनी दोन उपमुख्यमंत्री केले, आमचे सात होऊ द्या, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेसंदर्भात सूचक विधान केलं आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. आत्ता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले. 4-5 दिवसांत त्यांनी एक डाव टाकला होता. 15 लाख रुपये माणूस. 123 गावातले 100 लोक त्यांना फोडायचे होते. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पैसे घेऊन गेले होते. आम्हाला 4-5 दिवसांत पूर्ण माहिती मिळणार आहे. तेव्हा सविस्तर सांगेन. ते म्हणतायत हे पैसे राहू द्या तुम्हाला खर्चायला. 15 लाख रुपये खर्चायला? समोरचा एक जण 150 एकरचा होता. तो म्हणाला माझ्याकडून 50 लाख घेऊन जा आणि तुझे कोण गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना दे, असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केला.