। मुंबई । वृत्तसंस्था ।
प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारचा हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे.
भाजप सरकारने यापूर्वीच अनेक तारखांना महत्त्वाचे दिवस म्हणून घोषित केलं आहे. यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.