गेल्या 27 वर्षांत सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ
हरित आच्छादने तथा जलक्षेत्रांचा र्हास
बांधकाम क्षेत्रफळात 66 टक्के वाढ
। मुंबई । वृत्तसंस्था ।
बांधकाम क्षेत्राच्या वृद्धीमुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याची बाब भारतातील काही विद्यापीठांतील अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. यानुसार मुंबईतील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात खुल्या जागा, हरित आच्छादने आणि जलक्षेत्र यांचा र्हास करण्यात आला असून बांधकाम क्षेत्रफळात 66 टक्के वाढ झाली आहे.
नवी दिल्ली येथील जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, हैदराबादचे उस्मानिया विद्यापीठ, उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लीम विद्यापीठ या अभ्यासकांचा अर्बन हीट आयलॅण्ड डायनामिक्स इन रिस्पॉन्स टू लॅण्ड-युज/लॅण्ड-कव्हर चेंज, इन द कोस्टल सिटी ऑफ मुंबई हा शोधनिबंध इंडियन रिमोट सेन्सिग जर्नल या पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. मुंबईने 1991 ते 2018 या काळात 81 टक्के खुल्या जागा, 40 टक्के हरित आच्छादने आणि सुमारे 30 टक्के जल क्षेत्र गमावले आहे. मात्र याच कालावधीत बांधकाम क्षेत्रफळात 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या 27 वर्षांत मुंबईच्या तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे.
उपग्रहाधारित प्रतिमांचा वापर करून अभ्यासकांनी मुंबई शहर आणि उपगनरांतील एकूण 603 चौरस किलोमीटर प्रदेशाचा अभ्यास केला. यात 1991 ते 2018 या काळात झालेला जमिनीचा वापर आणि जमिनीच्या आच्छादनातील बदल, कमाल, किमान आणि सरासरी तापमानातील फरक, जमिनीच्या पृष्ठभागावरील तापमान, झाडे-झुडपांच्या आच्छादनातील बदल विरुद्ध शहरी बांधकाम घनता या बाबी विचारात घेण्यात आल्या.
- आकडेवारीच्या आधारे…
- मुंबईत 1991मध्ये 287.76 चौरस किलोमीटर हरित आच्छादन, 80.57 चौरस किलोमीटर खुल्या जागा, 27.19 चौरस किलोमीटर जलक्षेत्र होते. यापैकी 2018पर्यंत 193.35 चौरस किलोमीटर हरित आच्छादन, 33.7 चौरस किलोमीटर खुल्या जागा आणि 20.31 चौरस किलोमीटर जलक्षेत्र शिल्लक राहिले. 1991मध्ये सरासरी तापमान 34.08 अंश सेल्सिअस होते. 2018 साली ते अर्बन हीट आयलॅण्डमध्ये 36.28 अंश सेल्सिअसवर पोहोचले. म्हणजेच 2.2 अंश सेल्सिअसची वाढ झाली.