। उरण । वार्ताहर ।
पांडुरंग सांगू पाटील माध्यमिक महाविद्यालय उरण या शाळेमध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या दिमाखात तालुक्यातील नामांकित बालरोग तज्ञ डॉ. विकास मोरे आणि डॉ. अजय कोळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहीम याबद्दल दिलेले मार्गदर्शन फारच मोलाचे होते. या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून लाभलेले दोनही बालरोग तज्ञ यांनी विद्यार्थी व सभागृहाला जंतनाशक मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले.
लहान मुलांचा शैक्षणिक विकास होण्याबरोबरच शारीरिक विकास होणेही महत्त्वाचे असते. कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे दिसून येते. कृमीदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, असे डॉ. विकास मोरे म्हणाले.
बालकांमध्ये आढळणार्या कृमीदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. शाळेत जाणार्या व शाळेत न जाणार्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होते. याबद्दल डॉ. अजय कोळी यांनी मार्गदर्शन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे यांनी या जंतनाशक मोहिमेचे तालुक्यातील 1 ते 19 वर्ष वयोगटातील 33273 बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे येणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. विकास मोरे, डॉ.अजय कोळी बालरोगतज्ञ उरण, डॉ. बाबासो काळेल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कविता भगत,वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती म्हात्रे, राष्ट्रीय बाल स्वास्थ मिशन वैद्यकीय अधिकारी स्नेहा चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक अनिल निकम, डॉ. मयुरी गावडे, शरद घाडगे, रामदास दिसले, संजय पेडणेकर, आरोग्य सेवक आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.