सुनील सावर्डेकर यांची भूमिका
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण हवे आहे. मात्र, राजकीय आरक्षणाला आमचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका अनुसूचित जाती कमिटीचे प्रदेश काँग्रेस समन्वयक सुनील सावर्डेकर यांनी मांडली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी सावर्डेकर म्हणाले की, राज्यासह जिल्ह्यात अनुसूचित जातीचे लोक विखुरलेले आहेत. त्यांना एका छताखाली आणून त्याची वज्रमूठ बनविण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. समाज सुधारण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्या योजनेचा निधी या समाजाच्या विकासासाठी होताना दिसत नाही.
ते पुढे म्हणाले की, समाज दुर्लक्षित राहिल्याने आलेला निधी परत जातो किंवा तो परस्पर अन्य ठिकाणी वळवला जातो. त्यामुळे या समाजाची प्रगती खुंटली आहे.या संवर्गातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिष्यवृत्ती ठेवण्यात आली होती. ही शिष्यवृत्तीही बंद केली आहे. ती पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
याशिवाय भाजपाच्या धोरणांवर टीका करताना सावर्डेकर म्हणाले की, भाजप सरकारने अनुसूचित जातीच्या योजना बंद करण्याचा घाट घातला आहे. त्याला विरोध करण्यासाठी अनुसूचित जातीचा मेळावा 22 नोव्हेंबरला शहरातील काँग्रेसभुवन येथे होणार आहे. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.