। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी आपण भारतातच असून येत्या 48 तासांत सीबीआयसमोर हजर होण्यास तयार असल्याचे सिंह यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यामध्ये सुरू असलेला वादावर चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी आम्हाला वेगळं चित्र दिसत असून देशमुख आणि सिंह यांच्यातील लढाई अधिक उत्सुकतेची बनल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. परमबीर सिंह आणि संजय पांडे यांच्यात झालेल्या संवादावर देखील सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे. पोलिस आयुक्त अशा जबरी कारवाया करत असतील तर सामान्य माणसाचे काय होत असेल? तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. परमवीरसिंग सिंह कुठे आहेत हे समजल्याशिवाय खंडणी प्रकरणात अटकेपासून संरक्षण देणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावेळी झालेल्या सुनावणीत म्हटलं होतं. तसेच परमबीर सिंह फरार झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. यावेळी परमबीर सिंह कुठे भारताबाहेर गेले नसून, ते देशातच आहेत. त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आले नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं.