अलिबाग | वार्ताहर |
गणेशोत्सवात सामाजिक जाणीव जागृतीची व प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा पुढे नेण्याच्या दृष्टीने कोव्हिड काळात नियम पाळून सामाजिक भावनेने रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन दि.9 ते 21 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरांवरील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
सदरील स्पर्धेचा उद्देश हा पर्यावरण रक्षण, निसर्ग संवर्धन, पसिर स्वच्छता व आरोग्याप्रती चांगल्या सवयी लावून गावपातळीवर जास्तीत जास्त लोकसहभाग घेऊन निर्मल वातावरणात पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करणे हा आहे. सदरील स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेण्याकरिता http://bit.ly/raigadganesh या गुगल लिंकवर दि. 21 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता सर्व स्पर्धकांनी नियम व अटींच्या अधीन राहून ऑनलाईन नोंदणी करावी.
संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक निवडून त्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यास हातभार लावावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.