पेण | वार्ताहार |
आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद,पंचायत समितींच्या निवडणुकीत पेण तालुक्यात कोणाशी मैत्री करायची,युती करायची की आघाडी याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी घेतील अशी माहिती शेकाप तालुका चिटणीस संजय डंगर यांनी दिली.
पेण शेकाप कार्यालयात पाणी प्रश्ना संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळेला शेकापची भविष्यात आघाडी कोणासोबत राहील. असे पत्रकारांनी तालुका चिटणीस संजय डंगर यांना विचारणा केली असता. त्यांनी सांगितले की, याबाबत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील. परंतु शेतकरी कामगार पक्षाने आजपर्यंत जोडलेली मैत्री ही स्वताःहून कधीच तोडली नाही. परंतु मित्राने देखील मित्रासारखे वागणे गरजेचे आहे. मित्रच जर पाठीत खंजीर खूपसत असेल तर अशा मैत्रीची आम्हाला गरज नाही. आम्ही मैत्रीधर्म दरवेळेला योग्यप्रकारे पार पाडला आहे. परंतु आमच्या मित्राने तो मैत्रीचा धर्म व्यवस्थित पाळला नाही.अशी टीकाही त्यांनी केली.
ज्यांना आम्ही नगरपालिकेत तन, मन, धनाने मदत केली. तिच मंडळी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आमच्या विरूध्द दंड थोपटत होते. मग आम्ही यांचा आत्ता का विचार करावा आमच्या मित्राला जर अशी मंडळी हवी असली तर ती त्यांना लखलाभ असो.
संजय डंगर,तालुका चिटणीस
आमच्या जुन्या मित्राला आमचे सांगणे आहे की, आम्ही आमच्याकडून मैत्री तोडणार नाहीत. परंतु मैत्री साठी स्वतःची फरफट देखील करणार नाहीत. हे ही लक्षात ठेवावे अशा पध्दतीने प्रसार माध्यमांच्या समोर आपली प्रतिक्रिया देत शेकाप चिटणीस संजय डंगर यांनी आपले विचार मांडले.