| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलसह खांदेश्वर, मानसरोवर, खारघर या हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकात सध्या भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. टोळक्याने फिरणार्या या श्वानांच्या भीतीने स्थानकात चढणार्या आणि उतरणार्या प्रवाशांना काहीशा भीतीनेच स्थानकात यावे लागत असून स्थानिक प्रशासनाने या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात दररोज कामानिमित्त जाणार्यांची संख्या मोठी आहे. सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या या स्थानकातुन खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा, खांदा वसाहत आणि नवीन पनवेलमध्ये राहणार्यांची मोठी वर्दळ असते. हे स्थानक त्यांना वाहतुकीसाठी सोयीचे असल्याने येथील बहुतांशी प्रवासी याच स्थानकात उतरतात. दररोज सात ते आठ हजार प्रवासी या स्थानकावरून प्रवास करीत असून पाच लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळते. दिवसेंदिवस स्थानकातील प्रवाशांची संख्या वाढत आहे. रेल्वे स्थानकावरून कामोठे वसाहत, नवीन पनवेलकरिताही एनएमएमटीच्या फेर्या सुरू करण्यात आल्या आहेत. या मुळे स्थानकात प्रवाशांची संख्या वाढत असली तरी स्थानकात सुविधांचा अभाव असल्याचे पाहायला मिळते.
बनावट पावत्यांचा वापर
खान्देश्वर स्थानकात प्रवेश करण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या दिशेने असलेल्या मार्गावर अनधिकृतपणे वाहनतळ चालवले जात आहे. सिडको अथवा इतर कोणत्याही प्रशासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या या ठिकाणी वाहन उभी करण्यासाठी बनावट पावत्या वापरून शुल्क वसुली केली जात आहे.
पार्किंगचा अभाव…
रेल्वे स्थानक परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम सुरू असल्याने येथील काही वाहनतळ बंद करण्यात आले आहेत. या मुळे उपलब्ध असलेले वाहनतळ कमी पडत असून वाहनचालकांना रस्त्यावर जागा मिळेल तिथे वाहन उभी करावी लागत असून ’नो पार्किंग’ म्हणून घोषित रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनावर वाहतूक विभागाचे कर्मचारी कारवाई करत असल्याने वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
भुयारी मार्गात पावसाळ्यात साठते गुडघाभर पाणी; योग्य उपाययोजनेचा अभाव
खान्देश्वर रेल्वे स्थानक समुद्रसपाटीपासून तीन मीटर उंचीवर आहे. असे असतानाही स्थानकात जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साठत असल्याने प्रवाशांना स्थानक गाठण्यासाठी पाय आणि पादत्राणे भिजवूनच जावे लागते. प्रत्येक पावसाळ्यात या समस्येला प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. नियोजनबद्ध शहरांचे शिल्पकार अशी नवी मुंबईची ओळख आहे, मात्र खान्देश्वर रेल्वेस्थानकातून प्रवास केल्यावर सिडको महामंडळाचा हा दावा फोल ठरल्याचे चित्र अनुभवास येते. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना न करण्यात आल्यानेच प्रवाशांना या समस्येला तोंड द्यावे लागते. सिडको प्रशासन मात्र पाणी तुंबण्याच्या या प्रकारावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अद्यापही अयशस्वी ठरले आहे.
फेरीवाल्यांकडून होतोय मीटर रूमचा वापर
हार्बर मार्गावरील इतर स्थानका प्रमाणेच खान्देश्वर रेल्वे स्थानकातदेखील फेरीवाल्यांचा मुक्त वावर पाहायला मिळतो. गंभीर बाब म्हणजे स्थानकात असलेल्या विजेच्या मीटर रूमचा वापर आपले साहित्य ठेवण्यासाठी फेरीवाले करत असल्याचे पाहायला मिळते.
पाणपोईची सफाई तब्बल तीन वर्षांनी
स्थानकात पाणी पिण्यासाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध आहे, मात्र या ठिकाणी पाणी साठवणूक करण्यासाठी वापरात असलेल्या टाक्यांची साफसफाई 2023 साली करण्यात आला असल्याचा उल्लेख करण्यात आलेला असल्याने मागील दोन वर्षांत पाणी साठवणूक करण्यासाठी वापरात असलेल्या टाक्यांची सफाईच करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या परप्रातींय फेरीवाल्यांनी हा रेल्वे परिसर गिळंकृत केला असून त्यांच्या दादागिरीचा त्रास स्थानिकांना होत आहे. तसेच भिकार्यांची वर्दळ या सर्वच स्थानकात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तर महिला वर्गांना तृतीयपंथांसह गर्दुल्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे पोलीस आपले कर्तव्य नियमित बजावत असले तरी त्यांची संख्या कमी असल्याने या लोकांचे फावते आहे. तरी याबाबत रेल्वे प्रशासनाने ठोस भूमिका घेवून या सर्व समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहे.







