। श्रीवर्धन । वार्ताहर ।
शहरात श्रीवर्धन नगरपरिषदेकडून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू होते. संपूर्ण शहरात जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्ताच्या बाजूने तसेच गरज असेल त्या ठिकाणी रस्त्यात आडवे खोदकाम करून जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे.जून महिना उजाडला तरी खोदकाम सुरू होते. जुलै महिन्यापासून पावसाने जोर धरल्याने कंत्राटदाराने खोदकाम थांबवले.खोदकामामुळे रस्त्यांच्या कडेला व आडवे केलेले खोदकामात पडलेले खड्डे अपुर्ण अवस्थेत ठेवल्याने मुसळधार पावसात थोडाफार टाकलेला भराव पाण्याबरोबर वाहून गेला.काही ठिकाणी खोदकाम झाल्यावर पुरेसा भराव न टाकल्याने अवजड वाहने खोदकाम केलेल्या जागेवरून गेल्याने पिचींग ही गटारात ढासळले आहे.
रानवली धरणातून शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा ह्या दृष्टीने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम एप्रिल महिन्या दरम्यान सुरू झाले.शहरातील अरूंद रस्त्यांच्या बाजूंनी तर काही ठिकाणी आडवे खोदकाम करून जलवाहिनी टाकण्यात आली. पावसाळा काही दिवसांवर आलेला असताना कंत्राटदाराने खोदकाम झालेल्या ठिकाणी खडी टाकून डांबरीकरण करणे अपेक्षित होते.परंतु कंत्राटदाराने फक्त खडी टाकून नगरपरिषदेचे व स्थानिकांचे समाधान केले.
श्रीवर्धन पर्यटन स्थळ असल्याने रस्त्यांवर पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ सतत सुरू असते.अरुंद रस्त्यामुळे वाहने समोरासमोर आल्यास कच्च्या भरावावर चालक आपले वाहन घालण्यास तयार होतं नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.खोदकामाच्या खड्डयांमुळे जर एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण?ऐन पावसाळ्यात रस्त्याचे विद्रुपीकरण करणार्या कंत्राटदारावर नगरपरिषद कारवाई करणार का.असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जातं आहे.
जीओ फायबर केबल टाकताना पडलेले खड्डे व रस्त्यावरचे खड्डे गोपाळकाला अगोदर भरले जातील.शहरातील जलवाहिनी करिता जे खोदकाम सुरू आहे ते काम पावसाळा असल्यामुळे कंत्राटदाराला बंद करुन खड्डे बुजवण्या सांगितले आहे.पावसाच्या दिवसात रस्त्यावर टाकलेले डांबर टिकाव धरत नाही त्यामुळे पावसाळा झाला की खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबर टाकण्यात येईल.
– विराज लबडे, मुख्याधिकारी