| पाली/बेणसे | वार्ताहर |
सध्या बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. ट्रॅक्टर व इतर यांत्रिक साधनांच्या तुलनेत जिल्ह्यातील अनेक शेतकरी अजुनही शेतीच्या कामासाठी बैलांच्या नांगराला पसंती देत आहे. जमीनीत खोलवर जाणारा नांगराचा फाळ, छोट्या व तुकड्यांच्या शेतासाठी उपयुक्त आणि बैलाला देण्यात आलेले महत्व यामूळे अजुनही बहुतांश शेतकरी नांगराचा वापर करत आहेत.
जिल्ह्यातील भात शेती हि तुकड्यामध्ये विभागली आहे. तसेच डोंगर उताराला लागून असलेली व दुर्गम आणि दुरच्या पल्ल्यातील शेती तसेच शेताभोवती असलेले बांध यामुळे तेथे ट्रॅक्टर नेणे व नांगरणी करणे गैरसोयीचे होते. मात्र नांगर व बैल कुठेही सहज नेले जाऊ शकतात. बैल नांगराचा फाळ जमिनीत खोलवर जाऊन जमीन अधिक भुसभूशीत करतो. त्यामूळे पेरणी करणे सोप्पे जाते. शेतात बैलाचे पाय पडणे हे अनेकांना शुभ वाटते. तसेच बैलाच्या पायामूळे तण व गवत मरतात यामुळे काही शेतकरी पेरणी व लावणीच्या दरम्यानच्या नांगरणीला बैलांच्या नांगराला पसंती देतात.
नांगऱ्याला मागणी अधिक
नांगरणी करणा-या शेतकर्यास किंवा मजुरांना नांगऱ्या म्हणतात. काही शेतकरी स्वतः आपल्या शेतात नांगरणी करतात. तर काही जण नांग-याला बोलवितात. एक बैलजोडी व नांगरासह नांगऱ्याची मजूरी 700 ते 1000 रुपये प्रती दिवस आहे. जर पैसे नाही घेतले तर त्या बदल्यात नांगरऱ्याकडे शेतीवर काम करण्यासाठी तीन-चार माणसे द्यावी लागतात. असा हा व्यवहार असतो. नांगऱ्याला मजुरी बरोबरच एक वेळची न्याहरी, जेवण व दोन वेळेचा चहापाणी दयावे लागते. तरी देखील या नांगऱ्याला खुप मागणी आहे.
दरवर्षी शेतीसाठी बैलांच्या नांगरालाच पसंती देतो. ट्रॅक्टर पेक्षा नांगराने चांगली नांगरणी होते. बैलाच्या पायामुळे गवत व तण मरतात. शिवाय बैलाला आपल्या संस्कृतीत महत्व आहे. मात्र नांगर हल्ली फारसे मिळत नाहीत. मजुरीही वाढली आहे.
-निलेश शिर्के, शेतकरी, पुई-सुधागड