। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
पावसाळ्यात खेर्डीसह चिपळूण शहरात भरणार्या पुराला कारणीभूत असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन पूल तोडण्यास अखेर शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. पूल तोडण्यासाठी सव्वा कोटींहून अधिक निधी मंजूर होऊनही स्थानिकांच्या विरोधामुळे गेली 3 वर्षे पूल तोडण्याची कार्यवाही थांबली होती. मात्र, चिपळूण बचाव समिती आणि नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे अखेर शुक्रवारपासून पूल तोडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 2005 च्या महापुरानंतर हा जुना पूल चर्चेत आला होता. मात्र, 2021 मधील महापुरात वाशिष्ठी नदीवरील या दोन्ही पुलांमध्ये असलेला मातीचा भराव वाहून गेल्यानंतर हा पूल अधिक चर्चेत आला. दरम्यान, महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत वाशिष्ठी नदीवर नवीन पूल झाल्यानंतर जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.