। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड पोलीस मुख्यालय अलिबाग येथे दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजल्यापासून पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलीस मुख्यालय, विसावा परिसर व पोलीस लाईन येथे पडलेला प्लास्टिक तसेच इतर कचरा एकत्र करण्यात आला व प्लास्टिक पुनःप्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. यावेळी माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर तसेच रायगड पोलीस व अधिकारी उपस्थित होते. आरपीआय प्रकाश मोकल व आरपीआय जुनेद शेख, गुरव हे उपस्थित पोलिसांना मार्गदर्शन करत स्वच्छता मोहीम पूर्ण करून घेतली.
माणुसकी प्रतिष्ठानकडून अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, तानाजी आगलावे, नवनाथ गावडे व संपर्कप्रमुख अॅड. भूपेंद्र पाटील उपस्थित होते. यानंतर पाच किलोमीटर पोलिसांची दौड पूर्ण करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश देत लोकांनी प्लास्टिक वापर करू नये किंवा वापरत असाल तर त्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. आरपीआय प्रकाश मोकल यांनी उपस्थितांचे आभार मानले.