। रोहा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील जि.प., पं.स. प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या या प्रभाग रचनेला शेकापने आक्षेप घेण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ राजकीय दबावापोटी प्रशासनाने ही प्रभाग रचना जाहीर केली असल्याचा आरोप शेकाप नेते माजी आ.पंडित पाटील यांनी केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे प्रभाग रचना जाहीर केलेली आहे. यामध्ये जि. प. सदस्य संख्या 7 ने वाढून 66 होणार आहे तर पं.स. सदस्य संख्या 14 ने वाढून 132 होणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार सदर प्रारूप आराखडे तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 2017 च्या जि.प., पं.स. प्रभाग रचनादेखील 2011 च्या जनगणनेनुसार करण्यात आली होती. आता सुद्धा 2011 चीच जनगणना गृहीत धरण्यात आलेली आहे. यामुळे 2022 च्या जि.प., पं.स. साठी गट व गणात झालेली वाढ अनाकलनीय आहे, असे शेकापचे म्हणणे आहे.
मागील पाच वर्षात जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असणार्या ग्रामपंचायतीना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आल्याने या नगरपंचायतीमधील लोकसंख्या कमी झाली आहे. तरीदेखील नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत जि.प ,पंस गण व गटांची संख्या प्रशासनाने वाढवली आहे. नव्याने प्रभाग रचना करताना अनेक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता प्रभाग रचना करण्यात आल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत असून सदर प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती घेण्यात येणार असल्याचे राजकीय तज्ञ सांगत आहेत.
जि.प. आणि पं.स. साठी प्रशासनाने लोकसंख्येचे जे निकष वापरले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. सध्या जे प्रभाग जाहीर करण्यात आलेले आहेत त्यासाठी 2011 चीच जनगणना गृहित धरण्यात आलेली होती. ती 2017 मध्ये तीच गृहित धरली गेलेली होती. हे सर्व राजकीय दबावापोटी करण्यात आलेले आहे.त्या प्रभाग रचनेला शेकाप आक्षेप घेणार आहे.
पंडित पाटील, माजी आमदार