लाभार्थ्यांना बसला सर्व्हर बिघाडाचा फटका
। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्यातील शिधा वाटप केंद्रांवरील धान्य वितरण गेल्या दहा दिवसांपासून ठप्प आहे. वितरण प्रणालीतील सर्व्हरच्या बिघाडाचा फटका लाभार्थ्यांना बसला आहे. ऑफलाईन पध्दतीने धान्य वितरणाची सोय उपलब्ध नसल्याने, अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य वितरण बंद झाले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंगर्गत लक्ष्य निर्धारीत वितरण प्रणालीमार्फत ई पॉस मशिनव्दारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार 2017 पासून राज्यात सर्वच शिधा वाटप केंद्राना ई पॉस मशिन उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.या मशिन्सच्या साह्याने लाभार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने धान्य वितरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र सर्व्हरमधील बिघाडामुळे 20 जुलै पासून सार्वजनिक वितरण प्रणाली आंतर्तूगत धान्य वितरण बंद पडले आहे.
त्यामुळे अनेक पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिका धारकांना जुलै महिन्याचे धान्य मिळू शकलेले नाही.शासनाने ऑफ लाईन पध्दतीने धान्य वितरणावर निर्बंध आणले आहेत, आणि ऑनलाईन वितरण बंद आहे. त्यामुळे अनेक गरजू कुटुंब हक्काच्या धान्यापासून वंचित राहिले आहेत. रायगड जिल्ह्यात 4 लाख 30 हजार शिधापत्रिका धारक आहेत. ज्यातून 17 लाख 79 हजार लोकांना धान्य वितरण केले जाते. सर्व्हरमधील बिघाडामुळे 50 लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे धान्य मिळू शकलेले नाही. राज्यातील सर्व विभागात धान्य वितरणाची जवळपास हीच स्थिती आहे.
आम्ही सर्व्हर ठीक होण्याची वाट पाहत आहोत. तांत्रिक बिघाडाबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. एक ते दोन दिवसात ही तांत्रिक अडचण दूर होईल अशी अपेक्षा आहे. ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे धान्य मिळाले नाही. त्यांना ऑगस्ट महिन्यात दोन्ही महीन्याचे धान्य दिले जाईल.
सर्जेराव सोनवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड