टेकड्या तोडून माती उत्खनन केल्याचा आरोप
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या रानवली धरण परिसरात सुरू असलेल्या गाळ उपसा कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गाळ काढण्याच्या नावाखाली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या आणि उंचवटे तोडून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणातील गाळ काढण्यासाठी कंत्राट मंजूर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मातीचा उपसा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या क्षमतेच्या डंपरद्वारे ही माती धरण परिसरातून बाहेर नेण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या पंधरा दिवसांत परिसरात मोठ्या प्रमाणात डंपरची वाहतूक झाल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. दहा चाकी डंपरच्या वहनक्षमतेचा विचार करता हजारो टन माती परिसरातून हलविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच नियमानुसार रॉयल्टी भरली गेली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, काढण्यात आलेल्या गाळ अथवा मातीचे अधिकृत मोजमाप जाहीर करण्यात यावे, तसेच पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री व डंपरची वाहतूक सुरू असताना संबंधित विभागांनी नियमित देखरेख केली होती का, याबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
