| बीड | प्रतिनिधी |
बीड येथे शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातून कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांना सहआरोपी करण्याची तसेच त्यांचे लोकप्रतिनिधित्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात “शिवाजी कोण होता?” या वादग्रस्त पुस्तकाच्या संदर्भात प्रकाशक व डाव्या विचारसरणीचे युवा नेते कॉ. प्रशांत अंबी यांना देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा उल्लेख करण्यात आला आहे. याच प्रकारच्या वैचारिक द्वेषातून यापूर्वी पानसरे यांची हत्या झाली होती, असा मुद्दा उपस्थित करत अशा धमक्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले.
शेकाप पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, पुस्तक न वाचता केवळ विचारधारात्मक विरोधातून धमक्या देणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे. अशा प्रवृत्तींवर लगाम घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई अपरिहार्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात सखोल चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे आणि त्यांचे लोकप्रतिनिधित्व तात्काळ रद्द करावे, अशी ठोस मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कारवाई लांबवल्यास शेकापकडून राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देत या आंदोलनाची जबाबदारी शासनावरच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी शेकापचे मराठवाडा चिटणीस भाई मोहन गुंड, जिल्हा चिटणीस बापूसाहेब सोळुंके, शिवशक्ती-भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विचारांशी असहमती असू शकते, पण त्यासाठी धमक्या देणे आणि हिंसेचे वातावरण निर्माण करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. पानसरे यांच्या हत्येचा इतिहास डोळ्यासमोर असताना प्रशासनाने गप्प बसणे म्हणजे गुन्ह्याला मूक पाठिंबा देण्यासारखे आहे. तात्काळ कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
– भाई मोहन गुंड





