शेकाप-राष्ट्रवादी जनतेला न्याय देणारी आघाडी : आरिफ मणियार
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी ही फुले, शाहू आंबेडकर विचारधारेची असून ही आघाडी लोकांना न्याय देणारी आहे असे प्रतिपादन प्रभाग क्र. 4 चे उमेदवार आरिफ मणियार यांनी केले.
पाली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या प्रसार प्रचार प्रक्रियेत आजी माजी आमदार, खासदार, मंत्रीगण सहभागी झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. या प्रचार प्रसार रॅलीत दस्तरखुद्द राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील व खासदार सुनिल तटकरे हे देखील प्रचार रॅली व सभा द्वारे आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार प्रसारात सहभागी झाल्याने कार्यकर्ते व उमेदवार यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
बल्लाळेश्वर हे तीर्थक्षेत्र असून भाविकांना पाली शहरात येण्यास अडथळा निर्माण होऊ नये याकरिता बाह्यवळण रस्ता तयार करून वाहतूक कोंडी कमी करणार असल्याचेही आरिफ मणियार यांनी म्हटले आहे. अष्टविनायक तिर्थक्षेत्रांपैकी धार्मिक स्थळ असलेल्या पाली नगरपंचायतीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व राजकीय भवितव्य ठरविणार्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष नेतेमंडळींनी कंबर कसली आहे.