पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी सोमवारी (15 नोव्हेंबर) रिलायन्स कंपनीवर धडक मोर्चा काढणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भीमराव आंबेडकर हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाची जयत तयारी केली आहे. प्रकल्पग्रस्त एकजुटीने रिलायन्सवर धडक देणार आहेत. या आंदोलनात रायगडसह राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. विविध प्रमुख मागणीसाठी शिहू नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र, 35 वर्षांपासून संघर्षमय लढा देत आहेत. न्यायहक्कांसाठी अनेकदा विविध प्रकारची आंदोलने केली, तुरुंगवास ही सोसला, मात्र आजवर समाधानकारक न्याय मिळाला नसल्याची खंत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे. आताच्या या लढ्याला शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास प्रकल्पग्रस्तानी व्यक्त केला.