महावितरणचा गलथान कारभार
| छ. संभाजीनगर | प्रतिनिधी |
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निमखेडा बु.येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे 11 के.व्ही. मुख्य वाहिनीच्या तारांवर झालेल्या स्पार्किंगमूळे शेतकऱ्यांचा 30 ते 40 एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना सोमवारी (दि.20) दुपारी 12 वाजताच्यादरम्यान घडली. घटनास्थळी शेतकऱ्यांनी लागलेली आग आटोक्यात आणण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. यात लाखोचे नुकसान झाले आहे. वर्षभर खतपाणी घालत या पिकाचा सांभाळ केला जातो, मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्याऐवजी डोळ्यातून अश्रू निखळत होते.
आज घडीला पूर्ण तालुक्यातच महावितरणचे धोरण, म्हणजेच शेतकऱ्यांचे मरण अशीच काही अवस्था बघायला मिळत आहे. अनेक वर्षापासूनच्या जीर्ण झालेल्या तारा, वाकलेले खांब, तर नव्याने होणारी कामे देखील दर्जेदार होत नाही किंवा त्यात काही आर्थिक देवाण-घेवाण होत असल्यामुळे की काय लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ याची दखल देखील घेत नाहीत. त्यामुळे याबाबी गांभीर्याने घेतल्या, तर असे संकटे शेतकऱ्यांवर वारंवार येणार नाही. त्यामुळेच लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष व प्रशासनातील वरिष्ठांच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांवर ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हे संकट ओढवले आहे.







