विशेष मोहिमेचा विद्यार्थ्यांना आधार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तातडीने देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पुढाकार घेतला आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 1 ते 15 एप्रिल या कालावधीत समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. 1 एप्रिलपासून सुरु झालेल्या या नाविन्य उपक्रमातून 5 दिवसांत सुमारे साडेचारशे जात वैधता प्रमाणपत्र देण्यास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला यश आले आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण घेणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे. अनुसूचित जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासप्रवर्गातील अकरावी, बारावी विज्ञान शाखा, अभियांत्रिकी पदविका तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या समितीच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, हे प्रमाणपत्र न मिळाल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी समता पंधरवडा विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. 1 ते 15 एप्रिल या कालावधीत हा नाविन्य उपक्रम असणार आहे. या मोहिमेद्वारे जात वैधता प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी मार्फत सुरु करण्यात आली आहे. कागदपत्रांची पुर्तता केलेल्या सुमारे 450 विद्यार्थ्यांना 5 एप्रिलपर्यंत प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी त्वरीत अर्ज सादर करावेत. ज्यांनी अर्ज सादर केले आहेत परंतु, अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, अशांनी समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी. 15 एप्रिलपर्यंत समता पंधरवडा विशेष मोहिमेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करून प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.
– जयंत चाचरकर, उपायुक्त तथा सदस्य,
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
प्रमाणपत्रासाठी वणवण थांबणार
रायगड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनेक महिने वाट पहावी लागत आहे. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी व्हावा, म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारे विशेष मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतून प्रलंबित प्रस्तावांची पडताळणी केली जाणार असून कागदपत्रांची पुर्तता करणार्या विद्यार्थ्यांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी होणारी वणवण थांबणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राबविण्यात आलेल्या समता पंधरवडा विशेष मोहिम या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.