सोनाराच्या पत्नी व मुलाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पाली कासार आळी बाजारपेठ येथील जयदेव ज्वेलर्स या दुकानातील सोनार जयदेव सामंत याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. मात्र, या घटनेनंतर पूर्णतः कोलमडून पडलेल्या त्या सोनाराच्या पत्नी व मुलाने गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. आमचा हसता खेळता परिवार उद्ध्वस्त करण्यास आणि माझ्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी पत्नी चंदना सामंत व मुलगा सुजन सामंत यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती गुरुवारी (दि.29) माध्यमांना दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाली बाजारपेठेत कासारआळी येथे जयदेव ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या रस्त्यालगत असलेल्या दुकानातील सोनार जयदेव हे रस्त्यावरून जाणाऱ्या मुली व महिला यांचे पाठीमागील बाजूने फोटो, व्हिडीओ काढत असल्याची बाब निदर्शनास आल्याने काही मुली व त्यांचे पालक जयदेव सोनाराला जाब विचारायला दि.19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुकानाजवळ गेले. यावेळी जमलेल्या जमावाकडून पतीला धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली असल्याचे पत्नी चंदना सामंत यांनी सांगितले. त्यानंतर पाली पोलिसांना पाचारण केल्यानंतर सोनार जयदेव सामंत यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
आमच्या घरातील कर्त्या पुरुषाला आत्महत्येच्या खाईत कुणी लोटले? त्यांच्यावर आत्महत्या करावा इतका दबाव कुणामुळे आला? जमावातील कुणी मारहाण केली? पोलीस ठाण्यात कोणत्या पोलिसांनी मारहाण केली? त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असे सवाल मयत सोनाराची पत्नी आणि कुटुंबियांनी उपस्थित केले आहेत. आमच्या नशिबी हे दुःख आले, असे दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून या प्रकरणाची रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी मयत सोनाराच्या पत्नीने केली आहे.
या प्रकरणात माझ्या पतीच्या गैरकृत्याबद्दल कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्यास आमची कोणतीही हरकत नव्हती, मात्र इतका दबाव कुणी आणला की ज्यामुळे पतीला जीवन संपवावे लागले, आमचा संसार अक्षरशः उघड्यावर पडला, आता घरातील आजारी वृद्ध महिला, मुलगा व आमचा सांभाळ कोण करणार, अशी व्यथा सोनाराच्या पत्नीने व्याकुळतेने मांडली आहे. आम्हाला या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी सोनाराची पत्नी चंदना सामंत व मुलगा सुजन सामंत यांनी केली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आता पुढे काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांचे म्हणणे काय? दरम्यान, हे प्रकरण नेमके काय आणि पोलिसांवर केलेले आरोप याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी याप्रकरणी आम्ही सहकार्य केले असल्याचे सांगत सोनार जयदेव सामंत यांच्या पत्नी व मुलाने केलेले आरोप फेटाळले आहेत. तर, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता या प्रकरणाची माहिती घेऊन कळवतो, असे सांगितले.
पोलिसांकडून मारहाण, पैशांची मागणी जयदेव सामंत यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांकडूनदेखील मारहाण करण्यात आली, तसेच त्याठिकाणी झालेल्या संवादावेळी माझ्यादेखील पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी कानशिलात लगावली आणि तुला इथं राहायचं आहे की नाही असे दरडावले, असा आरोप मयत सोनाराच्या पत्नीने केला. याशिवाय या प्रकरणात माझ्या भावाकडे पोलिसांनी 50 हजार रुपये आणि पार्टीसाठीदेखील पैसे मागितले असल्याचा खळबळजनक आरोप केला. भावाने पोलीस पैसे मागत असल्याचे घरात कळविले, मात्र आपल्याकडे इतके पैसे नाहीत, कुठून देणार? याचादेखील दबाव कुटुंबावर आल्याचे चंदना सामंत यांनी सांगितले.