। मुंबई । प्रतिनिधी ।
वैद्यकीय क्षेत्रामध्ये कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयचा वापर वाढत असताना, आता टीबी रुग्णांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. ‘एआय’वर आधारित हातात धरून (हँडहेल्ड) वापरण्याजोगी 24 एक्स-रे उपकरणे यासाठी वापरण्यात येणार असून, त्याद्वारे अवघ्या तीन मिनिटांमध्ये रुग्णांचा चाचणी अहवाल उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या उपकरणांचा वापर टप्प्या-टप्याने सुरू होणार आहे. महापालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी एकूण 24 उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. तीन विभागांमध्ये त्याचा प्रभावीपणे वापर सुरू झाला आहे.
केंद्रीय टीबी रोग विभाग आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार, 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025पर्यंत शंभर दिवसांची मोहीम राबवण्यात आली. टीबी रुग्णशोधाचा वेग वाढवणे, टीबीच्या मृत्यूदरामध्ये घट करणे हा याचा उद्देश होता. नवीन टीबी रुग्णांचा संसर्ग पसरू नये, यासाठी प्रसार रोखण्याचा प्रयत्नही या माध्यमातून करण्यात आला. या मोहिमेंतर्गत उच्च जोखीम असलेल्या 15 लाखांहून अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच 61 हजार ‘नॅट’ चाचण्या करण्यात आल्या. निदानासाठी मोबाइल एक्स-रे व्हॅनची उपलब्ध करण्यात आली आहे.
आता, एआय आधारित हँडहेल्ड एक्स-रे मशीनमुळे घरोघरी जाऊन तपासणी करणे शक्य होणार आहे. आजही समाजामध्ये टीबीसंदर्भात अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी सातत्याने जनजागृती केली जात आहे. त्याजोडीलाच, प्रत्यक्ष घरापर्यंत जाऊन चाचण्या केल्यामुळे रुग्णशोध तुलनेने सोपा होणार आहे. यामुळे केंद्रांपर्यंत जाऊन चाचणी आणि निदान करण्याचा रुग्णांचा वेळ वाचणार आहे. कृत्रिम प्रज्ञेवर आधारित उपकरणामुळे रुग्णाला टीबीच्या चाचणीचा अहवाल अवघ्या तीन मिनिटांमध्ये उपलब्ध होणार आहे. या चाचणीसाठी सर्वसाधारण रुग्णांमध्ये न मिसळता स्वतंत्रपणे चाचणी करणे शक्य होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील टीबी आजार प्रतिबंध कक्षातील अधिकार्यांनी दिली.
पथदर्शी प्रकल्प
टीबी हा संसर्गजन्य आजार आहे. मात्र, अनेक रुग्ण आपला आजार लपवून ठेवतात. त्यामुळे आजाराची तीव्रता वाढते. आजाराची माहिती योग्य वेळी दिली, तर त्वरित वैद्यकीय उपचार करता येतात. त्यासाठी सर्वेक्षण, निदान आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर दिला जातो. रुग्णालये किंवा उपचारकेंद्रांपर्यंत रुग्ण जात नसतील, तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे विविध सर्वेक्षणातून दिसून आले. त्यादृष्टीने हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे