| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायतीत सत्ताधारी शिवसेनेने घरपट्टी व नळपाणीपट्टी दरात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेऊन पाणीपट्टी दरात दुपटीने वाढ देखील केली. घरगुती नळकनेक्शन पाणीपट्टी 1000 रुपयांवरून 2000 रुपये करण्यात आली असून त्या प्रमाणे कर वसुली सुरु करण्यात आली आहे. पाणीपट्टी दुपटीने वाढविल्यान ग्रामस्थाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थ पुरते हवालदिल झाले असून याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.
नगरपंचायतीची जून 2015 मध्ये निर्मिती झाल्यावर ग्रामस्थांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु तशा सोयी सुविधा मिळत नसल्याने माणगाव ग्रामपंचायत होती ती बरी होती म्हणण्याची वेळ माणगावकरांवर आली आहे. माणगाव नगरपंचायतीत एकुण 17 वॉड असून यापैकी जुने माणगाव व नाणोरे गावाला अजूनही अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणीपट्टी इतरांबरोबरच समान घेतली जात आहे. जुने माणगाव येथील मस्जिद महोल्ला ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गेल्या 25 वर्षांपूर्वी मोहोल्ला व कुभारआळी ग्रामस्थांसाठी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना तयार केली होती. या ग्रामस्थांनी ही पाणी योजना देखभालीसाठी त्या वेळी माणगाव ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केली होती. म्हणजेच आज या योजनेची देखभाल नगरपंचायतीकडे आहे.
नगरपंचायतीची निर्मिती होवून 7 वर्षाहून अधिक काळ लोटला असून अजूनही जुने माणगाव येथील ग्रामस्थांना थेट काळनदीतील दुषित पाणी प्यावे लागत आहे. या भागातील ग्रामस्थांना नगरपंचायत हळूहळू दूषित पाण्याच्या रूपाने विष पाजत असल्याचा आरोप या भागातील सुज्ञ नागरिकांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केला आहे. परंतु या ग्रामस्थांकडून पाणीपट्टी इतरांप्रमाणेच वसूल केली जात आहे. माणगावात अनेक वॉर्डातून फिल्टरयुक्त शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. त्यांनाही तेवढीच पाणीपट्टी व ज्या भागात अशुद्ध पाणीपुरवठा केला जातोय त्यांनाही तेवढीच पाणीपट्टी हा कुठला न्याय ? असा प्रश्न जुने माणगावकरांना सतावतो आहे. या प्रश्नाबाबत वारंवार येथील ग्रामस्थांनी नगरपंचायतीचा लक्ष वेधूनही त्याकडे नगरपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे असा आरोपही होत आहे. उलट दुपटीने केलेली पाणीपट्टी या भागातील ग्रामस्थांच्या माथी मारली जात आहे. असा अन्याय माणगाव शहरातील इतर वॉर्डातील ग्रामस्थांवर झाला असता तर तेथील ग्रामस्थ नक्कीच गप्प बसले असते का ? असा सवालही जुने माणगाव येथील ग्रामस्थ करीत आहेत.
माणगाव नगरपंचायतीने विकासकामे करण्यासाठी मध्यंतरी दोन वेळा 3 कोटी रुपये म्हणजेच एकुण 6 कोटी रुपये आले असल्याचे शहरात बॅनर बाजी करून जाहीर केले होते. हा विकासनिधी थोडा पाणीपट्टीसाठी खर्ची करायला हवा होता मात्र तसे न करता नगरपंचायतीने पाणीपट्टीत दुपटीने दरवाढ करून येथील ग्रामस्थांना या महागाईच्या झळाळीत शॉक दिला आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीतील कांही वॉर्ड सोडल्यास बहुतांशी वॉर्डातून रोजंदारीवर काम करणारे गोरगरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गातील ग्रामस्थ राहत आहेत. या ग्रामस्थांना कोरोना संकट व निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त असा तडाखा बसलेला असून अध्याप हे ग्रामस्थ या संकटातून सावरलेले नाहीत. हे ग्रामस्थ हळूहळू या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच नगरपंचायतीने केलेल्या नळपाणीपट्टी करात दुपटीने दरवाढीबाबत सर्वत्र नाराजीचा सूर नगरपंचायतीबाबत उमटत आहे.