| मुरूड | वार्ताहर |
आगरदांडा – दिघी या एकाच जलमार्गावर चालणार्या दोन फेरी बोटींच्या तिकीट दरात असणार्या प्रचंड तफावतीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सुवर्ण दुर्ग शिपींग कारपोरेशन ची फेरी बोट 50 रु जादा आकारुन प्रवाशांची लुट करत होती. गेले दिड वर्ष चाललेल्या या लुटीकडे मेरीटाईम बोर्ड दुर्लक्ष करत होती. कृषीवलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या प्रभावामुळे रविवार 9 ऑक्टोबरपासून दोन्ही फेरी बोटीचे दर समान झाल्याने संभ्रम दूर होऊन प्रवाशांची होणारी लूट अखेर थांबली आहे. त्यामुळे प्रवाशांमधुन समाधान व्यक्त होत आहे.
सन 2022 डिसेंबरपासून फक्त तीन महिन्यांसाठी तिकीट दरवाढ करण्याची परवानगी सूवर्ण दुर्ग शिपींग कार्पोरेशनला मेरीटाईम बोर्डाने दिली होती. दिघी सागरी जलवाहतूक सोसायटीला तिकीट दरवाढ करण्याची परवानगी मात्र मिळाली नाही. त्यामुळे या एकाच जलमार्गावर चालणार्या या दोन फेरी बोटींच्या तिकीट दरात प्रचंड तफावतीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. वाढीव दर घेणार्या सुवर्ण दुर्ग शिपींग कारपोरेशनला फक्त तिन महिन्यांसाठी तिकीट दरवाढ करण्याची परवानगी होती ती संपली तरी गेले दीड वर्ष तिकीट दर कमी न करता बिंधास्त प्रवाशांची लुट सुरू होती.
अखेरीस प्रवाशांनी निदर्शनास ही बाब आणून दिली. या लुटी संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मेरीटाईम बोर्डाने दखल घेतली व वाढीव दर कमी केले. दोन्ही फेरी बोटीचे दर समान झाल्याने प्रवाशांमधील संभ्रम दूर होत होणारी पर्यटकांची लूट अखेर थांबली आहे.