होळीआधीच उष्णतेची दुसरी लाट; रायगडसह पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट
| मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. फेब्रुवारी संपताच मार्चच्या सुरुवातीलाच तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. होळीच्या आधीच दुसरी उष्णतेची लाट आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण पट्ट्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमान 36 अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. सोलापूरात सर्वाधिक 38.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या पाच दिवसांत राज्यातील तापमान 2 ते 4 अंशांनी वाढणार असून, पारा 41 अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत उष्णतेचा येला अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भात तापमानात वाढ झाली आहे, तर कोकणात उष्णेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान चढेच असून, गेल्या 24 तासांत किमान तापमानात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात किंचित घट झाली आहे. पुढील पाच दिवस मुंबई व उपनगर तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज ( 9 मार्च ) ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. 11 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट असून, त्यानंतर हवामान उष्म व दमट राहणार आहे. नुकताच संपलेला फेब्रुवारीचा पूर्ण महिना सरासरीपेक्षा खूप उष्ण ठरला. देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान 27.58 अंश सेल्सिअस असते, मात्र यंदा ते 29.7 अंश सेल्सिअस राहिले आहे. 1901 पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसर्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. 2023 च्या फेब्रुवारीत 29.44 अंश सेल्सिअस नोंद झाली होती.
रायगड तापणार
रायगडसह मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना दि. 9 ते 11 मार्चपर्यंत विशेष अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या दिवसात तापमानात वाढ होणार आहे. तापमानात सर्वाधिक चार अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिना ठरला विक्रमी उष्ण!
यंदाचा फेब्रुवारी महिना सरासरीपेक्षा अधिक उष्ण ठरला आहे. देशातील सरासरी तापमान 27.58 अंश सेल्सियस असते, मात्र यंदा ते 29.7 अंश सेल्सियस नोंदवले गेले. विशेष म्हणजे, 1901 पासून हा दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे.
पुढील काही दिवस उष्ण आणि दमट
11 मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून, त्यानंतरही हवामान गरम आणि दमट राहील. त्यामुळे नागरिकांनी थेट उन्हात जाण्याचे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून संरक्षण घ्यावे, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.