रायगडला मिळाल्या सात हजार बाटल्या
| रायगड | खास प्रतिनिधी |
निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान झाल्यानंतर मतदारांच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते. त्यामुळे दुबार मतदान तसेच बोगस मतदानाला आळा बसण्यास मदत होते. रायगड जिल्ह्यासाठी तब्बल सात हजार 425 शाईच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. 1962 साली पहिल्यांचा शाईचा उपयोग करण्यात आल्याने यावर्षी 2024 साली तब्बल 62 वर्ष पूर्ण झाली आहेत.
आयोगाने यावर्षी 26.55 लाख शाईच्या बाटल्या खरेदी केल्या आहेत. यासाठी तब्बल 55 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे शाईची किंमत वाढली असल्याचे स्पष्ट आहे. शाईमध्ये सिल्वर नायट्रेट हा प्रमुख घटक असतो. याच्या किंमतीनुसार शाईच्या किंमतीमध्ये चढ-उतार होत असतो. एकाच कंपनीकडून शाईची निर्मिती देशातील फक्त एक कंपनी या शाईची निर्मिती करते. म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड (एमपीवीएल) या कंपनीच्या माध्यमातून शाईची निर्मिती केली जाते. कंपनीच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाला 25 मार्चपर्यंत आवश्यक ती शाई पुरवण्यात आली आहे.
1962 मध्ये पहिल्यांदाच शाईचा वापर करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी सुमारे तीन लाख 89 हजार शाईंच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला होता. यासाठी 2.27 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये शाईंचा वापर सुरु होऊन 2024 मध्ये 62 वर्ष होत आहेत. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका या 1951-52 मध्ये पार पडल्या होत्या. त्यावेळी मतदान झाल्यावर बोटाला शाई लावण्याचा नियम नव्हता. यावेळी काही मतदार हे दोनदा मतदान करण्यास येत होते. असे प्रकार थांबवण्यासाठी बोटाला शाई लावण्याचा पर्याय समोर आला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या पार्श्वभूमीवर पर्यायाची चाचपणी सुरु केली होती. नॅशनल फिजिरल लॅबोरेटरी ऑफ इंडिया (एनपीएल) सोबत आयोगाने बोलणी केली. पाणी किंवा इतर रसायनाने मिटल्या न जाणार्या शाईची आयोगाला गरज होती. म्हैसुर पेंट्सने ही जबाबदारी घेतली. 1962 पासून हीच कंपनी देशाला मतदानासाठी लागणारी शाई पुरवते. विशेष म्हणजे कंपनी इतर 30 देशांना देखील शाईचा पुरवठा करते.
शाईचा फॉर्म्युला पूर्णपणे गुप्त
शाई कशापद्धतीने बनवली जाते, त्यात कोणते संयुगे टाकले जातात याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. शाईचा फॉर्म्युला कंपनीने सार्वजनिक केलेला नाही. लोकांना याचा फॉर्म्युला कळाला तर ही शाई मिटवण्यासाठी लोक पर्याय शोधतील. आणि बोगस मतदान होण्याची भीती आहे. त्यामुळेच शाईचा फॉर्म्युला गुप्त ठेवण्यात आला आहे.