उन्हाळी रानफुलांचा बहर; पर्यटकांसाठी मोठे आकर्षण
| माणगाव | सलीम शेख |
एप्रिल, मे महिन्यात उन्हाचा पारा चढत असताना रानावनात मात्र उन्हाळी रानफुलांचा बहर आला आहे. चैत्र महिन्यात रानावनात झाडांना पालवी फुटली असून, या पालवीतच बहावा, निवडुंग, गुलमोहर इत्यादी वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुलांचा बहर आला आहे. रानावनात झाडांना पालवीबरोबरच आलेला हा बहर निसर्गप्रेमी, पर्यटक यांच्या आकर्षणाचा विषय होत असून, निसर्गातील उन्हाळ्याच्या काहिलीत बहरणारी रानफुले निसर्गाची शोभा वाढवित आहेत.
उन्हाळा हा काहीसा उदासवाना ऋतू असतो. झाडांची पानगळ, उन्हाची वाढणारी काहीली व भकास वाटणारे रान असे काहीसे चित्र सर्वत्र दिसते. मात्र, याच ऋतूत रानातील अनेक फळझाडे, फुलझाडे फुलून येतात. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात रानाची शोभा वाढत असून, रानावनात झाडांना उन्हाळी रानफुलांचा बहर आलेला दिसत आहे. कोकणातील सह्याद्री पर्वताची कडेकपारीत, रस्त्यांच्या दुतर्फा, शेत शिवारात असंख्य प्रकारच्या फळ, फुल झाडांना पालवीबरोबरच फुलांचे गुच्छ आले आहेत. एरवी उन्हाळा रुक्ष उदास वाटतो. मात्र, रानावनात फुलणार्या उन्हाळी रानफुलांनी निसर्ग उन्हाळ्यातही आपली शोभा कायम ठेवून सुंदरता कायम ठेवत असल्याचे निसर्गप्रेमी, पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत.
उन्हाळा वाढत असताना रानावनात असंख्य प्रकारच्या झाडा, वेलीना फुलांचा बहर आला आहे. हा बहर रानावनाची शोभा वाढवत आहे. रानात बहरलेली ही फुले पाहणे अतिशय आनंदाचे आहे. ही फुले ऐन उन्हाळ्यात फुलतात. यानंतर काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल. पावसाळा जवळ आल्याचे उन्हाळी रान फुले संकेत देतात.
विलास देगावकर,
फुल निरीक्षक, माणगाव