प्रा. डॉ. प्रफुल्ल माळी यांना विश्वास
। चौल । प्रतिनिधी ।
शेतकर्यांनी हळदीचे भरघोस पीक घेतल्यास या पिवळ्या सोन्यात क्रांती घडविण्याची ताकद आहे, असा विश्वास डॉ. बाळसाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोलीचे प्रा. डॉ. प्रफुल्ल माळी यांनी व्यक्त केला.
अलिबाग तालुक्यातील चौल पंचक्रोशितील शेतकर्यांसाठी हळद लागवड मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कृषक कल्याणकारी संस्था, चौलच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप नारायण पाटील यांच्या वाडीत नुकतेच या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. प्रफुल्ल माळी यांनी उपस्थित शेतकर्यांना हळद लागवड ते प्रक्रिया या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले.केवळ भात शेतीवर अवलंबून न राहता आपल्याकडे असलेल्या पडीक जमिनीत तसेच आंबा, काजू बागेतील मोकळ्या जागेत, वरकस जमीन, माळरानावर गादी वाफ्यांद्वारे हळदीची लागवड करून अधिक उत्पादन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनीदेखील शेतकर्यांना कमी खर्चामध्ये चांगले अर्थार्जन कसे होईल, हे पटवून दिले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन प्रमिता पाटील यांनी केले.