| मुरूड | वार्ताहर |
हस्त नक्षत्राच्या समाप्तीनंतर सोमवारीच चित्रा नक्षत्राला प्रारंभ झाला असतांनाच मुरुड तालुक्यातील बहुतांशी भातशेतीतील भात पीक तयार झाले आहे. दसरा होऊन दिवाळीचे वेध लागले आहेत. परंतु येथे सातत्याने बरसणारा पाऊस काढता पाय घेत नसला तरी प्रती वर्षाप्रमाणे भातशेती पिकल्यानंतर घाटमाथ्यावरील मेंढपाळांनी आपल्या शेळ्यामेंढ्यांच्या कळपास घेऊन कोकणाकडे कूच केली आहे.
पुणे मुक्कामाच्या ठिकाणाहून लोणावळा खंडाळामार्गे बोरघाटातून सदर कळप कोकणात येताना दृष्टीस पडत आहेत. सहा – सात महिन्यांच्या मुक्कामात हे मेंढपाळ आपल्या वर्षांच्या पोटापाण्याची बेगमी त्यातून करतात. तसेच कोकणातील हिरव्या चार्यावर त्यांच्या शेळ्या मेंढ्यांचेही चांगले पोषण होते. येथिल शेतकर्यांच्या शेतात रात्रभर कळप बसवून आपली शेतजमीन कसदार करतात. त्या बदल्यात ते या मेंढपाळांना आपल्या शेतीत पिकलेले धान्य अथवा रोख रक्कम देतात. मे-जून महिन्याच्या अखेरीस ते आपापल्या गावी परततात. द्रुतगती मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढतांना शेळ्या मेंढ्यांचा शीस्तबद्धरितीने चाललेला कळप पाहणार्यांच्या हमखास मनात येते, माणसा परास मेंढरं बरी!