| उरण । वार्ताहर ।
गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावर रस्त्यावर दोन्ही बाजूला पार्कींग करून ठेवलेल्या वाहनांमुळे आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे सततची होणार्या वाहतूक कोंडीतुन प्रवाशी नागरिकांची सुटका करण्यासाठी सकाळ आणि सांधकाळ अवजड वाहतूक बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
गव्हाण फाटा दिघोडे मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी या मार्गावरील प्रवास करणार्या नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम खात्याने काही वर्षांपूर्वी गव्हाण फाटा, दिघोडे मार्ग चार गाड्या पास होतील असे बारा मीटर रुंदीचे सिमेंटचे रस्ते बनविले आहेत.
दास्तान ते दिघोडे मार्गावर छोट्याशा रस्त्यावर सकाळ संध्याकाळच्या वेळेस छोट्या वाहनास जाण्यास रस्ताच मिळत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये विद्यार्थी, नोकरवर्ग, प्रवाशी, रिक्षा चालक तासनतास अडकून राहतात. या सततच्या वाहतूक कोंडीचा त्रास नाहक त्यांना सहन करावा लागत आहे.
या वाहतूक कोंडीतून उरणकरांची सुटका करण्यासाठी उरणचे युवक एकत्र येत आंदोलन केले होते. परिणामतः आजच्या घडीला या वाहतूक कोंडीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रवाशी नागरिकांना याच्यातून मुक्त करण्यासाठी सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 अशी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.