। मुंबई । वृत्तसंस्था ।
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले आहे. मंगळवारी (दि.15) विधानसभेत विराधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकला. त्यानंतर मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सुरू असताना पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेतले.
मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवून देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड व इतर महिला नेत्यांनाही ताब्यात घेतले. तसेच या नेत्यांना ताब्यात घेतले असले तरीही त्यांना पुढे नेमके कुठे नेणार याबाबत मात्र अजूनही समजू शकले नाही.
आमच्याविरोधात कितीही षडयंत्र करा. तरीही आम्ही हार मानणार नाही. एका मोदीला संपवण्यासाठीचे तुमचे प्रयत्न आम्ही मोदींचे सैनिक मोडून काढू. आमच्याकडे अनेक बॉम्ब आहेत. योग्यवेळी ते फोडले जातील. तसेच आमचा संघर्ष पोलिसांशी नाही. परंतु, जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोवर आम्ही थकणार नाही, झुकणार नाही आणि विकणारही नाही.
देवेंद्र फडणवीस