उर्जा मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज; मुख्य अभियंत्यांचे प्रकल्पाकडे दुर्लक्ष
। उरण । वार्ताहर ।
तालुक्यात गॅसवर चालणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प हा एकमेव सरकारी उपक्रम आहे. या प्रकल्पातील सहा संचातून 672 मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकत असताना मुख्य अभियंत्यांनी वायू विद्युत प्रकल्पातील नादुरुस्त असलेल्या ब्लॉकमधील 2 बॉयलर आणि 1 स्टीम टरबाईनकडे दुर्लक्ष केल्याने वीजनिर्मिती कमी होत असून वायू विद्युत प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून सदर प्रकल्पाची पाहणी करून अशा अकार्यक्षम मुख्य अभियंत्यांच्या जागेवर कार्यक्षम मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. देशातील पहिले नैसर्गिक वायू पासून वीजनिर्मिती करणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प उरण तालुक्यात असून या प्रकल्पाची स्थापना 1983-84 साली करण्यात आली आहे.संपूर्ण जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या वायू विद्युत केंद्राची क्षमता 952 मेगावॉट होती. या प्रकल्पातील सहा संचातून 672 मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकते. काही वर्षांत गॅसपासून वीज निर्मित करणार्या संचाची कार्यक्षमता ही या प्रकल्पात येणार्या मुख्य अभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कमी होत चालली आहे. मुख्य अभियत्यांना मेंटेनन्स विभागातील कामगारांकडून गंभीर बाब निदर्शनास आणून देऊन ही प्रकल्पातील नादुरुस्त बाँयलर आणि स्टीम टरबाईनच्या कामाकडे वारंवार दुर्लक्ष करत असतील तर या प्रकल्पात स्फोटाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही अशी भिती रहिवाशी व्यक्त करत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे ऊर्जा हे खाते असल्याने त्यांनी उरण तालुक्यातील वायु विद्युत केंद्र प्रकल्पाची पाहणी करून वीज पुरवठ्याअभावी अंधारात गेलेल्या मुंबई शहराची विजेची वाढती गरज लक्षात घेऊन प्रकल्पात जास्त मेगावॉट वीजनिर्मिती कशाप्रकारे करता येईल. यासाठी पुढाकार घ्यावा तसेच वायु विद्युत केंद्र उरण या प्रकल्पाचे अकार्यक्षम मुख्य अभियंत्यांची खाते निहाय चौकशी करावी.
अॅड. सत्यवान भगत अध्यक्ष,
उरण तालुका मनसे