| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील राजिप तिघर शाळेत शिकणासाठी दूरवरून येणार्या आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी वाहना अभावी गैरसोय होत होती. त्याबाबत शाळेतील सर्व शिक्षकांनी यावर उपाय म्हणून स्वखर्चातून वाहनाची व्यवस्था केली आहे त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे शिक्षकांचे कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद शाळा तिघर येथे पहिली ते सातवी पर्यंत परिसरातील वाडी वस्तीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.नांगुर्ले कातकरी वाडी येथील इयत्ता पहिली ते पाचवीचे लहान वयोगटातील विद्यार्थी हे अडीच किलोमीटर चालत शाळेत येत असतात, लहान मुलांना चालत जाण्याचा खूप त्रास होत होता. पावसाळी दिवसात भरपूर गवत असल्यामुळे विंचू सापाची भीती असते. सकाळची शाळा असताना दुपारी शाळेतून घरी जाताना भरपूर ऊन याचा देखील लहानग्यांना खूप त्रास होत होता. तर पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी नांगुर्ले कातकरीवाडी मधून चालत यावे लागत असल्याने विद्यार्थी शाळेत यायला कंटाळा करायचे.
रायगड जिल्हा परिषद शाळा तिघर येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी गाडीची व्यवस्था केली आहे.या अनोख्या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर भगवान इंगळे, विषय शिक्षिका सविता अशोक खडे, उपशिक्षिका योगिता सुनील अहिरराव,उपशिक्षक जनार्धन उमाजी पजई तसेच गाडी मालक राजेंद्र पवार यांनी योगदान दिले.