महावितरणच्या कार्यालयात दिली धडक
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायत परिसरात सातत्याने पथ दिवे आणि घरगुती विजेबाबतच्या अनेक तक्रारी असून त्यात दोन मुख्य वायरमनची बदली करून त्या जागी नवीन नियुक्ती करण्यात न आल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे वरसोली ग्रामपंचायत च्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. सरपंच प्रमिला भाटकर, उपसरपंच मिलिंद कवळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत, मिलिंद नाईक, प्रियांका गुंजाळ आदींच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता एस सी इनामदार यांची भेट घेऊन चर्चा केली. संतप्त शिष्टमंडळाने ग्रामपंचायत क्षेत्रातील समस्या त्वरित सोडवून कायमस्वरूपी वायरमन नियुक्त करण्याची मागणी केली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार वरसोली ग्रामपंचायती कार्यक्षेत्रातील दोन मुख्य वायरमनची बदली अन्यत्र करण्यात आलेली आहे. बदली करण्यात आल्यानंतर सदर जागेवर दुस-या वायरमनची नियुक्ती न करता कॉन्ट्रॅक्टवर असणा-या दोन वायरमनकडून काम करुन घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्ट्रीट लाईट शासनाकडून बिले न भरल्यामुळे एप्रिल 21 पासून बंद करण्यात आलेली होती, शासनाच्या आदेशाप्रमाणे मागील थकबाकी तशीच ठेवून एप्रिल 21 ते ऑगस्ट 21 पर्यंत बिले भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर टाकण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीने दि.27 ऑगस्ट 2021 रोजी 92 हजार रक्कमेची 12 स्ट्रीट लाईटची बिले भरलेली आहेत. बिले भरल्यानंतर स्ट्रीट लाईट चालू करण्यात आलेली आहे, परंतु गेली 5 महिने स्ट्रीट लाईट बंद असल्याने, काही ठिकाणी स्ट्रीट लाईटची दुरुस्ती व स्ट्रीट लाईट बल्ब लावणे इत्यादी कामे अपूर्ण राहिलेली आहेत. वरसोली भागासाठी वायरमन नसल्याने वरसोली विद्यानगर भागात मोठी अडचण निर्माण झालेली आहे.
याबाबत वरसोली भागासाठी असणारे उपअभियंता यांचे म्हणणे आहे की, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणारे वायरमन बल्ब लावण्याची कामे करणार नाहीत मग बल्ब लावण्याची कामे करायची कोणी ? यापूर्वी विज वितरण कंपनीचे वायरमनच हे काम करीत आहेत. याबाबत आपली 15 दिवसापूर्वी भेट घेवून वरसोली गावाला नवीन वायरमन देण्याची मागणी करण्यात आलेली होती, त्यावेळी आपणाकडून गणपती सणासाठी 8 दिवसासाठी यापूर्वी असणारे गायकवाड याना देतो असे सांगितले होते परंतु गणपती सण 2 दिवसावर येऊनही वायरमन देण्यात आलेले नाहीत, स्ट्रीट लाईटची बिले भरुनही मोठया प्रमाणात गावात बल्व लावणेचे काम शिल्लक असून, सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. आपणाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाहो. ग्रामपंचायतीकडून स्ट्रीट लाईटची बिले अत्यंत तत्परतेने भरुन घेणेची कार्यवाही विज वितरण कंपनीकडून करण्यात आली. बिले भरुन घेताना मागील थकबाकीचा व्याजही वसुल करुन रक्कम घेणेत आलेली आहे. बिले भरुन घेताना जी तत्परता दाखविण्यात आली ती तत्परता स्ट्रीट लाईट दुरुस्ती करताना सातत्याने विनवणी करुन देखिल करण्यात येत नाही.
गावातील घरगुती ग्राहकांच्या तक्रारी वेळेवर होत नाहीत त्यांच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे सातत्याने येत आहेत, आपल्या कंत्राटी वायरमन यांच्यावर असणा-या नियमाच्या बंधनामुळे त्याना काम करणे सोईचे होत नाही,आपणाकडून वरसोली-विद्यानगर भागासाठी तातडीने दोन वायरमन उपलब्ध करणे अत्यंत अवश्यक आहे. तसेच वरसोलीसाठी असणारे मुख्य 2 वायरमन यांची बदली करताना त्यांच्या जागेवर दुस-याची नियुक्ती न करता त्याना बदलीच्या ठिकाणी पाठविणे हि अत्यंत बेजाबदार बाब आहे. नवीन वायरमन देण्याबाबत आपणाकडून काहीच कार्यवाही होत नाही. आपणाकडून स्ट्रीट लाईट दुरुस्ती/ बल्ब लावणेची, घरगुती ग्राहकांच्या तक्रारी, व 2 मुख्य वायरमन नियुक्ती बाबत तातडीने कार्यवाही होण्याची मागणी करण्यात आली आहे.