| अलिबाग | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.13) मतदानाच्या दिवशी मावळ लोकसभा मतदारसंघात दुपारपर्यंत कडक उन्हाळा, तर दुपारनंतर अवकाळी पडलेल्या धुवाँधार पावसाने मतदानाचे अक्षरशः तीनतेरा वाजले. आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी पाहता मतटक्का वाढवण्यात प्रशासनास सर्व सोपस्कार करुनही अपयश आले आहे. त्यामुळे पुरती दमछाक उडालेल्या प्रशासनाची अवकाळीने अधिकच तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांना ताटकळत राहावे लागले. दरम्यान, देशातील 10 राज्यांतील 96 मतदारसंघात मतदान पार पडले असून, 62.64 टक्के मतदानाची नोंद, तर राज्यातील 11 मतदारसंघांत 52.63 टक्के मतदान झाले. दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले असून, त्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले.
देशात 62.64, तर राज्यात 52.53 टक्के मतदान देशातील 10 राज्यामधील 96 मतदारसंघांपैकी महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात 52.63% (मावळ - 46.03%, पुणे - 44.90%, शिरुर - 43.89%, बीड - 50.37%, जळगाव - 51.98%, जालना - 59.44 %, नंदुरबार - 60.60%, रावेर - 56.16%, शिर्डी - 55.27%, अहमदनगर - 53.27%, औरंगाबाद - 54.02%) तर, ओडिशा (4) 63.85%, तेलंगणा (17) 61.16%, उत्तर प्रदेश (13) 57.35%, पश्चिम बंगाल (8) 75.72%, आंध्र प्रदेश (25) 68.12%, बिहार (5) 55.62%, जम्मू आणि काश्मीर (1) 35.97%, झारखंड (4) 63.35%, मध्य प्रदेश (8) 68.30% मतदान झाले असून सर्वाधिक पश्चिम बंगालमध्ये झाले.